प्रशासन गतिमान गाव केले सीलबंद
प्रतिनिधी / औंध
खटाव तालुक्यात कोरोनाचा विळखा आता घट्ट होत आहे. येळीव येथील एकाच कुटुंबातील एक महिला आणि दोन पुरुषांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने येळीव हादरले आहे.
येळीव ता. खटाव येथील एका कुटुंबातील व्यक्तीचे मुंबई येथे निधन झाले होते. त्याचे अंत्यसंस्कार मुंबईत केल्यानंतर त्याच्या अस्थीचे विसर्जन आपल्या गावी करण्यासाठी तिघेजण येळीव येथे अस्थी घेऊन गावी आले होते. मात्र गावी येताना अस्थीबरोबर कोरोनालासुध्दा घेऊन आले. गावात आल्यानंतर भाविकीतील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अस्थिचे विसर्जन केले. मुंबईहून आलेल्या कुटुंबातील सर्वांना ग्रामपंचायतीने होम क्वारंटाईन केले होते. मात्र दोन दिवसांनी बाधितापैकी पुरुष व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी मायणी येथे जाऊन तपासणी करून घेतली.
यावेळी त्यांचे आणि कुटुंबातील उरलेल्या दोघांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात खळबळ उडाली. तर अस्थी विसरर्जासाठी गेलेल्या भावकीतील इतरांच्या मनात भीतीचा गोळा उभा राहिला. बाधितांच्या संपर्कातील 14 जणांना घरातच होमक्वारंटाईन केले आहे. तसेच हायरिस्क म्हणून एकाला मायणी येथे आयसोलेशन करण्यात आले आहे.
अहवाल बाधित आल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीची उपाययोजना हाती घेतली आहे. तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, सपोनि उत्तमराव भापकर, डॉ अमित ठिगळे यांनी येळीवला भेट देऊन ग्रामस्थांना सुचना दिल्या आहेत. आज सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रकांत जगताप, ग्रामसेवक महेंद्र महामुनी ग्रामपंचायत सदस्य, आशा आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गावातील लोकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. परीसर निर्जंतुक करण्यासाठी औषध फवारणी केली आहे.