ग्राम. पं.-टास्कफोर्स कमिटी बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची लागण झाली तर तातडीने सरकारी आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी या. कोरोना बरा होतो. मात्र, त्यासाठी वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे. तेव्हा कोणताही आजार झाला तर तो अंगावर न काढता तातडीने त्यावर उपचार घ्यावेत, असे आवाहन येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अशोक दंडगी यांनी येळ्ळूरवासियांना केले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाबाबतचे नियम प्रत्येकाने पाळावेत, असे आवाहन करत मंगळवारपासून जी कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे तिचे प्रत्येकाने पालन करुन ग्राम पंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.
कोरोनाबाबत येळ्ळूर ग्राम पंचायतच्या टास्कफोर्स कमिटीने बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचा आजार जर दोन दिवसांत कमी झाला नाही तर तातडीने स्वतःहून रुग्णाने यावे. याचबरोबर गावातील डॉक्टरांनीही कोरोनाची लक्षणे असतील तर त्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवून द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्राम पंचायत पीडीओ अरुण नायक यांनी कोरोना थोपविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने मास्क वापरावे, सामाजिक अंतर राखावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारपासून कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामध्ये डॉक्टर्स, मेडिकल दुकाने, रेशन दुकाने, सिलिंडर गॅस, दूध डेअरी आणि सोसायटय़ा व बँका सुरू राहणार आहेत.
शेतकऱयांनी तोंडाला मास्क घालून शेताकडे जावे. एकाच ठिकाणी चार ते पाच जण थांबू नये, कोरोनामुक्त गाव करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही यावेळी पीडीओ अरुण नायक यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, महेश कानशिडे, विलास बेडरे, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, सुनील अरळीकट्टी, लक्ष्मण मेलगे, राकेश परीट, रूपा पुण्यान्नावर, सुवर्णा बिजगरकर, मनीषा घाडी उपस्थित होते.
बैठकीला डॉ. पी. टी. मुचंडी, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. सतीश पाटील, डॉ. तानाजी पावले, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संतोष पाटील हेदेखील उपस्थित होते. या सर्वांनी कोरोना काळात उत्तम प्रकारे सेवा बजावली आहे. याबद्दल ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांचे कौतुक केले.