10 जण गैरहजर राहिल्याने न्यायालयाने काढले वॉरंट : पुढील सुनावणी होणार 2 मे रोजी
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर खटल्याची सुनावणी गुरुवारी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात होणार होती. मात्र, येळ्ळूरच्या खटल्यातील दहा जण गैरहजर राहिले. त्यामुळे सुनावणी 2 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जे कार्यकर्ते हजर राहिले नाहीत त्यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट काढले आहे. गैरहजर राहिल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. कारण सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले तरच या खटल्याचे कामकाज होऊ शकते. त्यामुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांतून आणि वकिलांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
येळ्ळूर येथील वेशीमध्ये असलेला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. या सर्व खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. काही कार्यकर्ते गैरहजर राहिल्यामुळे खटला लांबणीवर पडत आहे. काहीवेळा या खटल्यातील पंच आणि फिर्यादीदेखील अनुपस्थित राहिल्याने तारीख पे तारीख पडत आहे.
गुरुवारी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, काही कार्यकर्त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांचे नाव चुकीचे पडले आहे तर स्वतःचे नावही चुकीचे नमूद केले आहे, असे म्हणत कार्यकर्ते न्यायालयाकडे आले नाहीत. मात्र, त्यामुळे हा खटला पुढे ढकलला आहे.
गैरहजर दहा जणांना वॉरंट
गुरुवारी सुधीर परशराम धामणेकर, हणमंत फकिरा धामणेकर, प्रशांत शंकर टक्केकर, मनोहर यल्लाप्पा मजुकर, सूरज यल्लाप्पा घाडी, परशराम यल्लाप्पा नंदी, सूरज नायकोजी, मनोहर भैरु कुंडेकर, नारायण बाळू कंग्राळकर, अनंत विष्णू पाटील हे कार्यकर्ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना वॉरंट बजावण्यात आला आहे.
खटला निकालात काढायचा असेल तर सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे खटला निकालात काढायचा असेल तर सर्वच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. एखादा कार्यकर्ता जरी गैरहजर राहिला तरी त्याचे कामकाज होत नाही. त्यामुळे खटल्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आले आहे त्यांनी न्यायालयात आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा, खटला पुढे ढकलत जाणार आहे. अनुपस्थित राहिल्यामुळे वॉरंटही निघणार आहे. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःहून त्याची काळजी घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. श्याम पाटील, ऍड. शंकर बाळनाईक, ऍड. विशाल चौगुले, ऍड. सुभाष पट्टण, ऍड. विकेश तेरदाळकर यांनी केले आहे.