प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी येळ्ळूर गाव निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर केले. त्यानंतर गावामध्ये पूर्णत: शांतता पसरली आहे. असे असले तरी काही अतिउत्साही तरुण रस्त्यावरून नाहक ये-जा करताना दिसत आहेत. त्यांना पोलीस ‘प्रसाद’ देऊ लागले आहेत. पोलीस आपले काम करत असले तरी जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याकरिता प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्राम पंचायतीबरोबरच येळ्ळूरच्या डॉक्टरांनी केले आहे.
येळ्ळूरचा एक तरुण मरकजमध्ये सहभागी झाला होता. काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या पत्नीलाही हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. ‘त्या’ तरुणाची तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तातडीने येळ्ळूर गाव लॉकडाऊन करण्यात आले. याचबरोबर निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
तरुणांनी घरीच थांबलेले बरे!
पोलिसांनी गावच्या सर्व सीमा बंद केल्या असल्या तरी जनतेनेही दक्ष राहणे गरजेचे आहे. कारण कोरोना हा अत्यंत महाभयानक विषाणू आहे. एकापासून दुसऱयाला संसर्ग वाढविणारा आजार असल्यामुळे सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. अन्यथा संपूर्ण गावावरच त्याचा परिणाम होऊ शकतो. काही ठिकाणी अजूनही तरुण एकत्र जमून चर्चा करत आहेत. मात्र अशी चर्चा करण्यापेक्षा त्यांनी घरीच थांबलेले बरे.
ग्राम पंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावामध्ये सर्व्हे सुरू आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेत आहेत. गावातील सर्व किराणी दुकाने तसेच इतर दुकानेही बंद ठेवली आहेत. औषध दुकाने व दूध डेअरींना मुभा देण्यात आली आहे. पण दूध डेअरीलादेखील ठराविक वेळ देण्यात आला असून त्यावेळेतच प्रत्येकाने व्यवहार करणे गरजेचे आहे.
चौघांना होम क्वारंटाईन
कोरोनाची लागण झालेल्या पती-पत्नीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे, अशी माहिती येळ्ळूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश दंडगी यांनी दिली. कोरोनाची लागण झालेल्या परिसराला पूर्णपणे बंद केले असून रुग्णाच्या घराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
जनतेने काळजी घेणे महत्त्वाचे
महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरावा, बाहेरुन घरी आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. दुसऱयाशी बोलताना किमान चार फूट अंतर ठेवावे. एकत्रित कोणीही थांबू नये. ताप, सर्दी, खोकला किंवा कोणताही आजार झाल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी, असे डॉ. दंडगी यांनी सांगितले.