शेतकऱयाला दोन लाखाचा फटका : मदतीचे आवाहन
प्रतिनिधी/ येळ्ळूर
अरवाळी धरणामध्ये पोहतानाच शर्यतीच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शेतकऱयाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंगाईनगर, येळ्ळूर येथील शेतकरी सदाशिव पाटील यांचा हा बैल आहे. त्यांना शर्यतीची आवड असल्यामुळे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शर्यतीची बैले पाळली आहेत. बादल नामक या बैलने अनेक शर्यती जिंकल्या आहेत. नेहमीप्रमाणे सदाशिव यांनी रविवारी सकाळी या बैलाला धुण्यासाठी अरवाळी धरणात नेले होते.
बैल धुतल्यानंतर पोहण्यासाठी त्याला आत सोडले. यावेळी अचानक बादलला हृदयविकाराचा झटका आला. त्याला बाहेर काढण्यात आले पण तेथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्यावर परिवारातील नागरिकांनी अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेमुळे शेतकऱयाला दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे. तेव्हा त्या शेतकऱयाला नुकसानभरपाई द्यावी. तसेच नागरिकांनीही आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.