प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर रस्त्यावरून खानापूर व परिसरातील गावांना वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही महिन्यात तर ही वर्दळ वाढली आहे. याचबरोबर येळ्ळूर विराट गल्लीपासून लक्ष्मी चौकापर्यंत रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे बऱयाच वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा वाहने पार्किंग करताना वाहन मालकांनी आणि चालकांनी रस्त्याच्या कडेला पार्किंग करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सध्या येळ्ळूरचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे शिवाजी रोडवर बाजारपेठेसारखी दुकाने झाली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरेदी करण्यासाठी रस्त्यावरच दुचाकी किंवा चारचाकी पार्किंग करून वाहनचालक जात आहेत. मात्र, यामुळे ये-जा करणाऱया वाहनांना त्याचा अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा दुकानदारांनीच आता वाहने पार्किंग करण्यास संबंधितांना सूचना करावी, अशी मतेही व्यक्त होत आहेत.
या रस्त्यावरून खानापूर, गर्लगुंजी, नंदिहळ्ळी, वाकडेवड्ड यासह इतर परिसरातील वाहने ये-जा करत असतात. वाळू, विटा आणि माती वाहतूक करणाऱया वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. राजहंसगडही आता पर्यटनस्थळ झाल्यामुळे पर्यटकांचीही गर्दीही वाढत चालली आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी शिवाजी रोडवर मोठी गर्दी होत आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यातच पार्किंगही रस्त्यावरच होत आहे. तेव्हा आता वाहनचालकांनी थोडीशी काळजी घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.