रिझर्व्ह बँकेकडून पुनरुज्जीवनाचा आराखडा जाहीर
मुंबई / वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादलेल्या येस बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 2 हजार 450 कोटी रुपये गुंतवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता येस बँकेची 49 टक्के मालकी एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जाणार आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर सीईओ आणि तीन संचालक नेमले आहेत. तसेच गुंतवणूकदारांना आपले दोन प्रतिनिधी नेमता येणार आहेत.
नव्या येस बँकेची मालकी मिळण्यासाठी नव्या गुंतवणूकदाराला अंदाजे अडीच हजार कोटींची गुंतवणूक करावी लागेल, असे आरबीआयने स्पष्ट केले होते. या गुंतवणूकीपैकी साधारण 1,400 कोटी रुपये तीन वर्ष काढता येणार नाहीत. त्यामुळे या निकषांवरही साऱयांचे लक्ष लागले होते. या सर्व प्रकरणात रिझर्व्ह बँक सीईओ आणि तीन स्वतंत्र संचालकांची नेमणूक करावी लागणार आहे. तर, गुंतवणूकदाराला आपले दोन प्रतिनिधी नेमता येतील. परिणामी येस बँकेची 49 टक्के मालकी एसबीआयकडे राहणार आहे.
कर्ज-वसुलीत प्रचंड तफावत
येस बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असूनही, थकीत कर्जाचा आकडा वाढत असूनही बँकेतून कर्जवाटपाचा ओघ सातत्याने सुरु होता. वास्तविक परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्मयता दिसल्यावर रिझर्व्ह बँकेने पावले उचलणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. साधारण 15 महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा अवाजवी कर्जवाटपाची दखल घेऊन येस बँकेचे सीएमडी राणा कपूर यांना पदावरुन दूर करण्याचे आदेश दिले. पण तोवर जवळपास 2 लाख 44 हजार कोटींचे कर्जवाटप झाले होते. यामुळे थकीत कर्जाचा आकडा आणखीनच वाढला होता. त्यामुळेच अखेर आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लागू केले होते.