लक्षावधी ठेवीदारांना सरकारकडून दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
थकित कर्जे मोठय़ा प्रमाणात वाढल्याने आणि गैरव्यवहार झाल्याने निर्बंध लादण्यात आलेली येस बँक आता पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी बँकेचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले. त्यामुळे आपल्या ठेवी बुडणार की काय अशी धास्ती घेतलेल्या लक्षावधी ठेवीदारांना मोठाच दिलासा मिळाला आहे. 5 मार्चला रिझर्व्ह बँकेने येस बँक आपल्या आधीन करून प्रशासकाची नियुक्ती केली होती.
आर्थिक डबघाईला आलेल्या या बँकेला स्टेट बँक व अन्य चार खासगी बँकांनी आर्थिक आधार दिल्याने तिला जीवनदान मिळाले आहे. बँकेला आता कोणतींही समस्या नसून थकबाकीची योग्य काळजी घेतली जाईल, असे बँकेच्या व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आपला प्रशासन नेमून पूर्वीचे संचालक मंडळ स्थगित केले होते. आता रिझर्व्ह बँकेने नियंत्रण काढल्याने गुंतवणूकदार व खातेदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
येस बँकेत आता स्टेट बँकेसमवेत, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बंधन बँक, फेडरल बँक व आयडीएफसी फर्स्ट या वित्तसंस्थांनी पैसे गुंतविले आहेत. स्टेट बँकेने 6 हजार 50 कोटी रूपये तर आयसीआयसीआय आणि एचडीएफसी यांनी 1000 कोटी रूपये गुंतविले आहेत.