ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झालेला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून, आता भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.
ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
अनिल देशमुखांना वाचवायचेच, असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय! 15 फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते ? कितीही झाकले तरी सत्य लपणार नाही! ‘ये पब्लिक है, ये सब जानती है!’असे दरेकर यांनी ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटसोबत दरेकर यांनी अनिल देशमुख यांचे फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेचे ट्विट देखील जोडले आहे. तसेच, खरंच….स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा! असे देखील दरेकर यांनी ट्विट केले आहे.