उत्तर प्रदेशात कोरोना परिस्थिती उत्तम हाताळल्यामुळे प्रशंसा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशसारख्या प्रचंड राज्यात कोरोना परिस्थिती उत्तमरित्या हाताळल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशचा आकार आणि लोकसंख्या काही देशांपेक्षाही मोठी आहे. तरीही आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने परिस्थितीवर कमी वेळात प्रभावी नियंत्रण मिळविले, अशी भलावण पंतप्रधान मोदी यांनी केली असून त्यामुळे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत नेतृत्व कोण करणार या संबंधीची संदिग्धता संपली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज कोरोना काळात प्रथमच आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीचा दौरा केला. त्यांनी एका प्रचंड जाहीर सभेत भाषणही केले. कोरोना परिस्थिती हाताळण्यासमवेतच राज्याच्या आर्थिक विकासातही योगी यांच्या नेतृत्वात नेत्रदीपक प्रगती झाली आहे. उत्तर प्रदेश आज विदेशी गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र बनले आहे. मेक इन इंडिया हे धोरण उत्तर प्रदेशात जोमाने क्रियान्वित केले जात असून रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात राज्याने लक्षणीय प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
अनेक प्रकल्पांवर काम
संरक्षण कॉरीडॉर, पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड एक्स्प्रेसवे, गोरखपूर लिंक महामार्ग, गंगा द्रुतगती महामार्ग, इत्यादी महाप्रकल्प योगी यांच्या नेतृत्वात झपाटय़ाने आकाराला येत आहेत. त्यामुळे येत्या दशकात राज्य आर्थिकदृष्टय़ा मोठा पल्ला गाठणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्रातही अग्रेसर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱयांसाठी अनेक योजना चालविल्या आहेत. त्यामुळे लवकरच उत्तर प्रदेश कृषी उत्पादनांचा निर्यातदार प्रदेश बनणार आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱयांना त्यांनी मोठाच आधार दिला. राज्यात महामार्गांचे जाळे विणल्याने कृषी उत्पादनांची ने आण वेगाने आणि सहजगत्या होत आहे, आदी बाबींवर पंतप्रधान मोदींनी भर दिला.