भाजपला घवघवीत यश मिळण्याचा आत्मविश्वास केला व्यक्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याप्रसंगी त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी निवडणूक अर्ज सादर करण्यापूर्वी गोरखपूर येथे एका जनसभेसमोर भाषण केले.
योगी आदित्यनाथ यांची ही प्रथमच विधानसभा निवडणूक आहे. त्यांनी आजपर्यंत पाच वेळा गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. गोरखपूर शहर या विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या सहाव्या टप्प्यात, 3 मार्चला मतदान होत आहे. ही निवडणुकीकडे साऱया देशाचे लक्ष लागले आहे.
संपत्तीची घोषणा
उमेदवारी अर्ज सादर करताना आदित्यनाथ यांनी त्यांच्या संपत्तीचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीचे एकंदर मूल्य 1 कोटी 54 लाख 94 सहस्र 54 रुपये इतके आहे. यात रोख रक्कम, सहा बँक खात्यांमधील रक्कम आणि बचत खात्यातील संपत्ती यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा 12 हजार रुपयांचा मोबाईल फोन असून एक सुवर्णसाखळी असून तिचे मूल्य 12 हजार रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे 1 लक्ष रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर असून 80 हजार रुपयांची रायफल आहे. त्यांच्याकडे कानात घालण्याची सोन्याची भिकबाळी असून तिचे वजन 20 ग्रॅम आहे. तिची किंमत 49 हजार आहे. त्यांच्यापाशी एक रुद्राक्षांची माळ असून तिचे मूल्य 20 हजार रुपये आहे.
रोख उत्पन्नाचीही घोषणा
योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गेल्या पाच वर्षांमधील त्यांचे उत्पन्नही घोषित केले आहे. त्यानुसार त्यांना 2020-2021 या आर्थिक वर्षात 13,20,653 रुपये, 2019-2020 या आर्थिक वर्षात 15,68,799 रुपये, 2018-2019 या आर्थिक वर्षात 18,27,639 रुपये, तर 2017-2018 या आर्थिक वर्षात 14,38,670 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
गुन्हेगारी प्रकरणे नाहीत
योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कोणतेही गुन्हेगारी प्रकरण सादर नाही. तसेच त्यांच्याकडे कोणतीही शेती किंवा बिगर शेती मालमत्ता किंवा घर नाही. त्यांचे वास्तव्य मठात असल्याने त्यांना स्वतःच्या घराची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्वतःच स्पष्ट केले होते. त्यांच्या नावावर कोणतेही वाहनही नसून त्यांच्यावर कोणतेही कर्ज किंवा थकबाकी नाही, असेही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत आहे.
अखिलेश यादव यांची प्रचंड मालमत्ता
योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची मालमत्ता प्रचंड आहे. यादव यांची मालमत्ता आदित्यनाथ यांच्या मालमत्तेपेक्षा 26 पट अधिक (साधारणतः 40 कोटी ) इतकी असल्याचे दिसून येते. मायावती यांचीही मालमत्ता कित्येक कोटींच्या घरात आहे.
भाजपचे वचनपत्र आज
भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात आपले निवडणूक वचनपत्र आज शनिवारी सादर करणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या सरकारने उत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणात आर्थिक प्रगती केली असून गुन्हेगारी प्रवृत्तींना संपविले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुधारली असून जनता मोकळा श्वास घेत आहे. राज्याला माफियांपासून मुक्ती मिळाली आहे, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले.
अर्ज नाकारल्याने ‘मृत व्यक्ती’ची निदर्शने
उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार आणि निवडणूक प्रक्रिया ऐन रंगात असली असताना घडलेली एक अनोखी घटना चर्चेचा विषय बनली आहे. कानपूर जिल्हय़ातील मतदारसंघातून एका ‘मृत व्यक्ती’ने उमेदवारी अर्ज सादर केला होता. तो निवडणूक अधिकाऱयांनी फेटाळला. त्यामुळे त्याने संतप्त होऊन निदर्शने केली.
संतोष मूरत सिंग असे या इच्छुकाचे नाव होते. सरकारच्या महसूल नोंदींनुसार त्याची मृत व्यक्ती अशी नोंद आहे. तो मूळचा वाराणसी येथील होता. आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याने कानपूर जिल्हय़ातील महाराजपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. तो नाकारण्यात आला.
बनावट कागदपत्रांमुळे…
कागदोपत्री मृत असणाऱया या व्यक्तीने चक्क पत्रकार परिषद घेऊन आपली कहाणी कथन केली. त्याच्या नातेवाईकांनी त्याला बनावट कागदपत्रे तयार करुन घेऊन त्यांच्या आधारावर मृत म्हणून घोषित केले. 2003 मध्ये मुंबई येथे झालेल्या लोकल बाँबस्फोटात तो मृत्यूमुखी पडला अशी नोंद सरकारी महसूल नोंदीमध्ये करण्यात आली. त्याचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांची साडेबारा एकर जमीन त्याच्या नातेवाईकांनी हडप केली आणि नंतर विकून टाकली. आता त्याची आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्याची धडपड सुरु आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्याने 2012 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्याच प्रमाणे त्याने 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला होता. पण हे सर्व अर्ज फेटाळण्यात आले. 2017 मध्ये त्याने शिवपूर विधानसभा मतदार संघात अर्ज सादर केला. तो मान्यही झाला पण निवडणुकीत त्याचा पराभव झाला. यंदा त्याला कानपूरच्या महाराजपूर मतदार संघातून ‘जनसंघ’ पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. तथापि, त्याचा अर्ज तांत्रिक कारणास्तव नाकारण्यात आला. उमेदवारी अर्जावर किमान 10 समर्थकांच्या स्वाक्षऱया असणे आवश्यक आहे. तेवढय़ा स्वाक्षऱया नसल्याने त्याचा अर्ज नाकारण्यात आला असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याने उमेदवारी अर्ज सादर केला. पण काही रकाने न भरल्याने तांत्रिक कारणास्तव तो अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे त्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे दिले होते. तसेच त्याच्या समर्थकांनी निदर्शनेही केली. हे सर्व होत असूनही ही व्यक्ती नेमकी कोण आहे ? ती जिवंत आहे तर तिची सरकारी कागदपत्रांमध्ये मृत अशी नोंद कशी ? यासंबंधात महसूल अधिकाऱयांनी नेमके काय केले आहे, हे गुलदस्त्यातच आहे.