प्रतिनिधी/ रत्नागिरी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित समाजातील 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी पिडीतेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुकारलेल्या या लढय़ात रत्नागिरीतील काँग्रेस पदाधिकाऱयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर सोमवारी सत्याग्रह आंदोलन केले.
योगी आदित्यनाथ सरकारच्या या मनमानी, असंवैधानिक कृत्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. त्याप्रमाणे सोमवारी रत्नागिरी शहरातील मुख्य ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनावेळी ‘योगी तुम गुंडा है, सारा देश शर्मिंदा है’, प्रियांका गांधी आंधी है, दुसरी इंदिरा गांधी है’, पहले लडे थे गोरोंसे, अब लडेंगे चोरों से’, अशा घोषणा देत योगी सरकारचा निषेध व्यक्त केला. हाथरस येथील दलित समाजातील 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिचे अनन्वित हाल करण्यात आले. या घृणास्पद घटनेने अख्खा देश हादरला. 19 वर्षाच्या या पीडितेला जिवंत असतानाही यातना देण्यात आल्या आणि मृत्यूनंतरही तिची अवहेलना करण्यात आली.
पिडीत कुटुंबाच्या घराजवळ शेकडो पोलीस तैनात करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याशी अत्यंत हीन पातळीवरचा व्यवहार करुन त्यांना व प्रियांका यांना अटक केली. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बेछूट लाठीमार करण्यात आलाचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलन करण्यात आले. आदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी केले. त्यावेळी उपाध्यक्ष अशोक जाधव, बरकत काझी, प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, जिल्हा चिटणीस बंडू सावंत, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, ऍड. अश्विनी आगाशे, कपिल नागवेकर, स्नेहा पिलणकर, रिजवान शेख आदी सहभागी होते.