केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उत्तर प्रदेशात प्रतिपादन
लखनौ / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान होण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे, असे महत्वपूर्ण विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी ते येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी ‘मेरा परिवार, बीजेपी परिवार’ ही घोषणा कार्यकर्त्यांना दिली.
भाजपच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पाया 2022 च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत घातला जाईल. या निवडणुकीनंतर पुन्हा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशची जनता त्यांनाच प्रचंड बहुमत देऊन पुन्हा विजयी करेल, असा विश्वास पक्षाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशला जे हवे ते दिले आहे. यापुढेही ते देत राहतील. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या मतदारांचाही त्यांच्यावरच विश्वास आहे. इतर पक्ष केवळ आपले आपले नेते आणि नेत्यांची कुटुंबे यांच्यातच गुरफटलेले आहेत. ही घराणेशाही भाजपमध्ये नाही, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ
या कार्यक्रमातून त्यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराचा एकप्रकारे पारंभच केला असे मानले जात आहे. दिवाळीच्या सणानंतर निवडणूक प्रचाराला गती येणार आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तनमनधनाने या प्रचारात सहभागी होणार असून पक्षाच्या विजयासाठी कष्ट करणार आहे. जेव्हा भाजपचे कार्यकर्ते भाजपचा ध्वज घेऊन रस्त्यावर येतात तेव्हा विरोधी पक्षांच्या छातीत धडकी भरते. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 300 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय असून ते गाठणारच, असेही ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
राज्याची प्रतिष्ठा वाढविली
गेल्या पाच वर्षांमध्ये योगी सरकारने जनहिताची कामे अविरत करुन राज्याची प्रतिष्ठा वाढविली आहे. या राज्याला आता त्याची योग्य ती ओळख प्राप्त झाली असून राज्याचे सामर्थ्य आणखी वाढविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सरकारे एखाद्या कुटुंबासाठी नव्हे, तर गरीब जनतेच्या हितासाठी बनविली जातात, हे भाजपनेच सिद्ध केले आहे. इतके दिवस घरात बसून असलेले विरोधी पक्षांचे नेते आता निवडणुकांचे वातावरण निर्माण होताच नवी वेषभूषा करुन घरातून बाहेर पडले आहेत आणि आमचेच सरकार येणार असा डांगोरा पिटत आहेत. अशा लोकांना राज्यातील जनता चांगलीच ओळखून आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेलाही फटकारले
शहा यांनी रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिराचाही उल्लेख केला. काही विरोधी पक्ष यापूर्वी भाजपची राममंदिर प्रश्नावरुन चेष्टा उडवित असत. ‘मंदिर वही बनाएंगे, मगर तिथी नही बताएंगे’ असे टोमणे मारले जात. तथापि आता राममंदिराच्या निर्माणकार्याचा शुभारंभ झाला असून विरोधक खोटे पडले आहेत, अशी कडवट टीकाही अमित शहा यांनी त्यांच्यावर केली. ही टीका त्यांनी शिवसेनेवर केल्याचे मानले जात आहे. कारण ही घोषणा त्याच पक्षाची होती.
पाच राज्यांमध्ये निवडणूक
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये येत्या मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुका भाजप, काँगेस तसेच अन्य प्रादेशिक पक्षांसाठीही महत्वाच्या आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य असल्याने आणि तेथे लोकसभेच्या 80 जागा असल्याने तेथील निवडणूक सर्वाधिक महत्वाची आहे.
वातावरण तापण्यास प्रारंभ
ड विधानसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीस राज्यात प्रारंभ
ड उत्तर प्रदेशात बहुरंगी, बहुढंगी लढती होण्याची दाट शक्यता
ड यंदा आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँगेसही लढतीत शक्य
ड भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा शहांच्या हस्ते शुभारंभ