डॉ. सौम्या वेर्णेकर यांचे प्रतिपादन : केएलई चॅरिटेबलतर्फे कोरोना व्हायरसबाबत जागृती
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना हा धोकादायक व्हायरस आहे. हा चीन देशामधून सर्वत्र पसरत चालला आहे. हा व्हायरस खोकला, कफ व अस्वच्छ हातांमुळे पसरत आहे. सध्या जगभरात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावर सध्या तरी कोणतीही उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे खबरदारी हाच यावरील उपाय असल्याचे डॉ. सौम्या वेर्णेकर यांनी सांगितले.
येळ्ळूर रोड येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये बुधवारी कोरोना व्हायरस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर हॉस्पिटलचे संचालक एस. सी. धारवाड, माजी महापौर विजय मोरे, केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर, ज्ये÷ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. राजशेखर म्हणाले, खोकला, ताप, सर्दी, घशाचे दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. वटवाघुळ, उंट, डुक्कर, झुरळ, उंदीर, साप या प्राणी व पक्ष्यांना हा व्हायरस होतो. परंतु चीनमध्ये या प्राण्यांना खाण्यात येत असल्यामुळे तो माणसांमध्ये पसरत असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय मोरे म्हणाले, या व्हायरसला न घाबरता लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घ्या. कोणतेही अन्न खाताना स्वच्छता तपासून घ्या. बऱयाचवेळा अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केले जाते. यामुळेही अनेक आजार जडत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक एस. सी. धारवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण नागण्णावर यांनी केले. यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.