प्रतिनिधी / इचलकरंजी
योग्य प्रश्न विचारणे आणि त्याची अचूक उत्तरे शोधणे हेच इतिहासकारांमोरील खरे आव्हान आहे, असे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे प्राध्यापक स्टीवर्ट गॉर्डन म्हणाले. शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे २४ वे वार्षिक अधिवेशन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र इचलकरंजीतील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात होत आहे. आज (दि. ८) आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी बीजभाषक म्हणून प्रा. गॉर्डन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे होते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. विकास कदम, शिवाजी विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर, माजी विभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. अनिल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. गॉर्डन यांनी महाराष्ट्राच्या सतराव्या आणि अठराव्या शतकातील इतिहासाचे लेखन जुन्या आणि पारंपरिक चौकटीतूनच सुरू असल्याची खंत व्यक्त केली. तसेच इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला जग समजू शकते. त्यासाठीच इतिहास निर्णायक आहे. इतिहास म्हणजे नुसती कागदपत्रे धुंडाळून घटिते आणि घटनांचा शोध घेणे नव्हे. तर भूतकाळाला एक निर्णायक प्रश्न विचारण्यासाठी केलेला संघर्ष असतो, असे प्रा. गॉर्डन म्हणाले.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद आणि राष्ट्रीय चर्चासत्र हे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस होणार आहे. आज पहिल्या दिवशी कोल्हापूरसह, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्धी आणि विद्यार्थी उपस्थित होते.