एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नका : चाचपणी करुनच नुकसानभरपाई देणार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. सरकारने या विविध व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी पॅकेज जाहीर केले. त्यानंतर संबंधितांनी आपली माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. बीपीएल कार्डधारकांना हे पॅकेज देणार असे सांगितल्यानंतर अनेक जण खोटी माहिती देवून एजंटांकरवी अर्ज दाखल करत आहेत. मात्र संबंधित व्यक्ती तोच व्यवसाय करत आहे की नाही, याची चाचपणी करुनच नुकसानभरपाई दिली जाणार असून कोणत्याही एजंटांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे लॉन्ड्री, टेलर, नाभिक, घर काम करणाऱयांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले होते. लॉकडाऊन काळात त्यांना घरीच बसावे लागले. कर्नाटक सरकारने या सर्वांना 2 हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र हे अर्ज काही एजंट 100 ते 150 रुपये घेवून देत आहेत. खोटी माहितीही ते त्यामध्ये नमूद करत आहेत. बीपीएल कार्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळतात असे सांगून अनेकांकडून पैसे उकळत आहेत. मात्र आपला व्यवसाय नसताना खोटी माहिती दिली तर तो गुन्हा ठरू शकतो. त्यासाठी खोटी माहिती न देता तसेच कोणालाही पैसे न देता ऑनलाईनद्वारे किंवा संबंधित विभागाकडे स्वतःच माहिती द्यावी. कोणालाही यासाठी पैसे देवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज आल्यानंतर त्याची चाचपणी करुनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. तेव्हा एजंटांच्या आमिषाला बळी न पडता खरी माहिती नोंदवावी, असेही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि सुनील जाधव यांनी कळविले आहे.