प्रतिनिधी / ओरोस:
लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेला शासनामार्फत पुरविल्या जाणाऱया योजनांचा योग्य पद्धतीने लाभ दिला जातो किंवा नाही, याच्यावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. अन्नधान्य अथवा राहण्याच्या व्यवस्थेबाबतच्या कोणत्याही असुविधेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा विधी प्राधिकरणशी संपर्क साधावा तसेच या dlsasindc@gmail.com ई मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश दीपक म्हालटकर यांनी केले आहे.
कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. या काळात गोरगरीब जनतेसाठी शासनाने मदत यंत्रणा राबविली आहे. या सुविधा पुरविताना त्याची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्गात अशा प्रकारच्या काही तक्रारी असल्यास त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अन्याय झाल्यास नागरिकांना थेट तक्रार करता येणार आहे.
बेघर, स्थलांतरीत कामगार आणि गोरगरीब यांना या संकट काळात शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मदत करीत आहे. या मदतीवर देखरेख ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सावंतवाडी येथील एका ठिकाणच्या समुदायाला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरवठा होत नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र संबंधित पुरवठा करणाऱया यंत्रणेला याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही म्हालटकर यांनी स्पष्ट केले.