पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे आवाहन : मंगलमय वातावरणात आगळावेगळा प्रकाशन सोहळा
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगले पाहिजे. देव, देश, धर्म आणि गुरु यांच्याप्रति श्रद्धाभाव जागृत ठेवून कर्म केले पाहिजे तरच नरदेह अमृताप्रमाणे संजीवक ठरतो. जगण्याचा अर्थ ज्याला कळतो, तो जीवनात यशस्वी होतो. म्हणून ’एक तरी ओवी अनुभवावी’ या वचनाप्रमाणे ‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ हे दिव्य व्यक्तीत्वावरील उत्कृष्ठ पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि स्वकल्याणाबरोबरच समाजकल्याणकार्यही साधावे, असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ संप्रदायाचे पीठाधीश्वर पद्मश्री सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी तपोभूमी कुंडई येथे केले.
कुंडई येथील तपोभूमीच्या प्राकारात साहित्यिक, पत्रकार तसेच दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक यांनी लिहिलेल्या ‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ नाटय़पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुमाता ऍड. ब्राह्मीदेवी, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, लेखक राजू भिकारो नाईक, नावेलीचे नवनिर्वाचित आमदार उल्हास तुयेकर तसेच राजस्थानचे दिनेशकुमार राजपूत व सुमन राजपूत उपस्थित होते.
‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ स्तुत्य कार्य
विवेक जागृत झालेला योद्धा म्हणजेच स्वामी विवेकानंद. ज्यांनी सनातन वैदिक हिंदू धर्म, सातासमुद्राकडे पोहोचविला. गुरु रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सुयोग्य दीक्षा दिली. परिणामी स्वामी विवेकानंद परमेश्वरस्वरुप झाले. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा. त्यांच्या विचारांचे आचरण व्हायला हवे. नाईक यांनी ‘योद्धा संन्यासी विवेकानंद’मधून त्यांचे विचारांचे पुनरजागरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. काहीजण विचित्र नावांची आणि टंगळमंगळ नाटके लिहीतात मात्र राजू नाईक यांच्या या महान नाटकाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे, असे सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य पुढे म्हणाले.
‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ क्रांतिकारक पुस्तक
पुस्तकावर भाष्य करताना प्रा. अनिल सामंत म्हणाले की, ‘योद्धा संन्यासी विवेकानंद’ हे क्रांतिकारी पुस्तक आहे. त्याकडे केवळ वाङ्मयीन मूल्ये, रंजकता किंवा नाटक म्हणून बघता येणार नाही तर कुटुंब, व्यक्ती, विश्व, राष्ट्र यांना सलणाऱया प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या नाटय़संहिते मिळते.
हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील माईल स्टोन
सत्यामधील कटूता वगळून ते कथन करणे, शब्दामधला कल्लोळ वगळून ते जपून वापरणे आणि दिशा सांभाळून गतीमानता वाढविणे, ही पथ्ये लेखकाच्या आत्मभानाची साक्ष देतात. अध्यात्माचे बीजारोपण आणि मानवधर्माची शिकवण विवेकानंदांच्या आचरणातून सदैव व्यक्त झाली. हे पुस्तक म्हणजे गोव्यातील मराठी साहित्यातील माईल स्टोन म्हणजे मैलाचा दगड आहे, असेही सामंत म्हणाले.
महानाटय़ स्वरुपात सादरीकरणही होण्यची गरज
पत्रकार, नाटककार राजू भिकारो नाईक यांच्या या नाटय़लिखाणाचे चीज व्हायचे असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजेत, तसेच गोव्यातील नाटय़संघांनी महानाटय़ स्वरुपात प्रयोग घडवून आणले पाहिजेत. लिहितांना महानाटय़ स्वरुपातच लिहिले आहे. नाईक यांच्या या प्रयत्नाला ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असेही सामंत म्हणाले.
ब्रह्मेशानंद स्वामींनी स्वहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करून लेखक आणि संबंधितांना आशीर्वाद दिले. नाईक यांनी अनिल सामंत व ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना स्मृतिभेट दिली. अत्यंत मंगलमय वातावरणात आगळय़ावेगळय़ा पद्धतीने पार पडलेल्या या प्रकाशन सोहळय़ाचे सूत्रसंचालन श्री दत्त पद्मनाभ संप्रदायाचे महा प्रबंधक शुभक्षण नाईक यांनी केले.
स्वामींचे विचारधन इतरांनाही मिळावे म्हणून…
नाटय़लेखक नाईक यांनी सांगितले पाच वर्षे आपण स्वामी विवेकानंदांच्यावरील 85 हून अधिक मराठी, हिंदी, इंग्रजी संदर्भग्रंथाचा अभ्यास केला. स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोव्यातील तसेच मुंबई, कन्याकुमारी अशा ठिकाणी भेट दिली. कॉलेज जीवनात स्वामींचा आपल्या जीवनावर प्रभाव पडला. त्यांचे विचारधन आपल्यासाठी शक्ती, चैतन्य निर्माण करणारे ठरले. नैराश्याच्या काळात तर रामबाण औषध ठरले. आपणास जे मिळाले, ते इतरांनाही मिळावे, म्हणून हा लिखाणाचा प्रयत्न केला.