सध्या टीव्ही चॅनेलवर सतत एकच बातमी प्रामुख्याने चालवली जाते, ती म्हणजे सुशांतसिंग राजपूत प्रकरण! त्याच बरोबरीने अमली पदार्थांच्या सेवनात गुरफटलेली सिनेसृष्टीतील तरुण मंडळी. त्याची साखळी पार विदेशात जाऊन पोचले. पण हे केवळ सिनेजगतातच चालते असे नाही. सर्व क्षेत्रात ही बेकायदेशीर कृत्ये केली जातात आणि दुर्दैवाने त्यात तरुण मंडळी…ज्यांना देशाचे भविष्य म्हटले जाते ती मोठय़ा संख्येने अडकत आहेत. अशा व्यसनांच्या आहारी जाण्याची अनेक कारणे असतात. पहा ना…
यौवनं धनसंपत्तिः प्रभुत्वमविवेकिता । एकैकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्।।
अर्थ – तारुण्य, धनसंपत्ती, सत्ता, अविचारीपणा यातील एकेक गोष्ट अनर्थाला कारणीभूत ठरते, जिथे या चारही एकत्र येतात तेव्हा काय विचारावे? तारुण्यात अंगात जोश असतो, रक्त सळसळते, उत्साह असतो. त्यामुळे त्या धुंदीत माणूस वहात जातो. चांगल्या वाईटाची तो पर्वा करीत नाही. त्यातच पैसा हातात खुळखुळत असेल तर तो जास्तच विलासी बनतो, व्यसनाधीन होतो. ‘रम, रमा,रमी’ यात अडकतो. त्यातच त्याचा विनाश होतो. सत्ता किंवा अधिकार हाती असेल तर उन्मत्त होतो, कुणालाही जुमानत नाही. तो आपला विवेक हरवून बसतो. अविचाराने वागतो. अनाचार,अत्याचार करू लागतो. मग काय! विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखाः। ज्याचा विवेक भ्रष्ट झाला आहे, त्याचा शतमुखाने विनाश होतो. सध्या हेच झाले आहे. आता परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो. नाहीतर त्यांचा अधपात ठरलेलाच. म्हणूनच आपले गुणदोष या सर्वाला कारणीभूत ठरतात.
आरोप्यते शिला शैले यत्नेन म्हणा यथा। निपात्यते क्षणेनाधस्तथात्मा गुणदोषयोः।।
अर्थ- शिळा (मोठा दगड) पर्वतावर चढवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात. पण खाली येताना क्षणार्धात येते. तसेच आपल्या गुणदोषांचे होते. सद्गुण अंगी बाणवणे खूप कठीण असते, दोष मात्र पटकन अंगी बाणतात. म्हणूनच व्यसनांच्या आहारी माणसे पटकन जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य मात्र मातीमोल होते! किती समर्पकपणे सांगितले आहे ना!
आता थोडे संस्कृत शिकू.
स्थालिका-थाळी, पात्रम्, भाण्डम्-भांडे, कंसः-वाटी, चमसः-चमचा, करण्डः-पेटी, छुरिका-सुरी.
–अनुराधा दीक्षित