प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या परिपूर्ण विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी 9 कोटी 84 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या रंकाळा तलावास मंजूर निधीतून पर्यटन वाढीच्या दृष्टीने विकासकामे व्हावीत. विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता होण्यापूर्वीच कामास सुरवात होण्याकरिता निविदा प्रकिया पूर्ण करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
रंकाळा तलावास नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या निधीबाबत सोमवारी महानगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. यावेळी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, अरुण गवळी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मागणी केल्याप्रमाणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रंकाळा तलाव सुशोभिकरण आणि संवर्धनासाठी 15 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून 9 कोटी 84 लाख रुपये महानगरपालिका प्रशासनास तत्काळ दिले आहेत. यामध्ये शासन निर्णयानुसार 25 टक्के हिस्सा महानगरपालिकेचा असणार आहे.
बैठकीत बोलताना क्षीरसागर म्हणाले, महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या आराखडÎामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने निधी विनियोग होईल अशी कामे प्राधान्याने होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून, आचारसंहितेमुळे काम लांबणीवर पडणार नाही याची दक्षता घेवून, तात्काळ निविदा प्रक्रिया पार पाडून कामास सुरवात करावी. मंजूर निधीतून नियोजित कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करून पुढील कामास सुरवात करावी. पुन्हा मेंटेनन्स निघतील अशी नवीन कामे करण्याचे टाळून पर्यटकांना आकर्षित करतील अशी सेल्फी पॉइंन्ट, सनसेट पॉइंन्ट, वॉटर लाईट शो आणि म्युझिकल फौंटेन्ससारखी कामे करण्यास प्राधान्य द्यावे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांसह जागरूक नागरिकांच्याही सूचना घ्या
प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी वारंवार रंकाळा तलावाच्या सुधारणेविषयी बातम्यांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत असतात. त्यांच्यासह जागरूक नागरिकही याबाबत प्रशासनास विविध सूचना करीत असतात. त्यांच्या सूचनांचाही विचार कामे होताना करण्यात यावा.
क्षीरसागर यांचे सिमावासीयांना बळ ः काळी फीत लावून बैठकीस उपस्थिती
गेली 65 वर्ष बेळगावसह मराठी भाषिक 865 गावे महाराष्ट्र राज्यात सामाविष्ट करण्यात यावी, या मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधव लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव आणि सीमाभागात `काळा दिवस’ पाळण्यात येतो. शिवसेना सिमालढÎात सिमावासीयांच्या पाठीशी असून, सिमालढÎास बळ देण्याकरिता महापालिकेतील बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर काळी फीत लावून उपस्थिती होते.