नाट्यलेखक-दिग्दर्शक अनिल दांडेकर यांची मागणी
प्रतिनिधी/रत्नागिरी
कोरोना काळात रत्नागिरीतील रंगकर्मी नेपथ्यकार दादा लोगडे, छायाचित्रकार संजू साळवी, लहू घाणेकर, मोहन लाखण, किशोर सावंत तसेच अ. भा. ना. प. च्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राम जाधव यांचे झालेले निधन रंगभूमी क्षेत्राला चटका लावणारे ठरले. हे कलावंत आयुष्यभर कलेसाठी सरळ, साधेपणाने वागले. अशा सर्व कलाकारांच्या चिरंतन स्मृति जपण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेने रत्नागिरीत रंगभवन (कलाभवन) उभारावे. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकाप्रमाणे नाट्यकर्मींसाठी हे एक चिरंतन स्मारक व्हावे, अशी संकल्पना नाट्यलेखक आणि दिग्दर्शक अनिल दांडेकर यांनी मांडली.
रत्नागिरीतील रंगकर्मी गणपत तथा दादा लोगडे, लहु घाणेकर, मोहन लाखण, किशोर सावंत आणि संजीव साळवी, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 91 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राम जाधव यांना रविवारी शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी नाट्यलेखक व दिग्दर्शक अनिल दांडेकर यांनी या रंगकर्मी, कलाकारांचा आठवणींना उजाळा दिला. त्यांनी या नाट्यकर्मींच्या स्मृति जपण्यासाठी एक चिरंतन स्मारक होण्यासाठी संकल्पना मांडली. त्यात कलाकारांच्या मेडल्सचे दालन, तालमीसाठी रंगमंच, सुसज्ज ग्रंथालय व्हावे. भवन उभारण्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेकजण यासाठी मदत करतील, असे सांगितले.
काल-परवापर्यंत काम करणारी ही सारी कलाकार मंडळी अचानक निघून गेल्याने सर्वांना धक्का बसला. ही पिढी केवळ कलाकारांची होती. त्यांनी कधीही व्यवहार पाहिला नाही. त्यांनी कलाकार म्हणून मिरवले नाही. अविनाश फणसेकर, प्र. ल. मयेकर असे अनेक नामवंत कलाकार रत्नागिरीने गमावले. या साऱयांच्या स्मृतींसाठी रंगभवन व्हावे. यावेळी स्वराली शिंदे म्हणाल्या की, संजू किंवा दादा आज हयात नाहीत, हे अजूनही मनाला पटत नाही. पण अशी माणसं जातात, त्यांचे कार्य शिल्लक राहते. त्यांना सलाम करण्यासाठी आले. अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी प्रास्ताविक केले. नाट्य परिषदेचे पदाधिकारी आसावरी शेट्ये, सतीश दळी, प्रफुल्ल घाग, श्रीनिवास जोशी यांच्यासह विविध नाट्य संस्थांचे पदाधिकारी, कलाकार व दिवंगतांचे कुटुंबीय उपस्थित होते.
दादांचा राहून गेलेल्या सत्काराने रंगकर्मी हेलावले
दिग्दर्शक श्रीकांत पाटील म्हणाले, बसणी गावात दादा लोगडे यांचा सत्कार करायचा होता, पण राहून गेला. दादा कधीही नकारात्मक बोलायचे नाहीत. सर्वांना चिअरअप करायचे. दादांनी नेपथ्य, मेकअप करताना कधी व्यवहार पाहिला नाही. त्यामुळे अनेक संस्थांना आता नाटक करताना फटका बसणार आहे.
Previous Articleरत्नागिरी : आंबा-काजूच्या बागा जळून खाक : कोट्यवधींचे नुकसान;
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.