वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली (ता. पन्हाळा) येथे रंगपंचमी खेळून पोहायला विहिरीत गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १५) दोघे (रा. वैभवनगर कोडोली असे त्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वैभवनगर येथील शाळकरी चार ते पाच मुले रंगपंचमी खेळून जवळच असलेल्या बामनांचा मळा येथील गजानन कापरे यांच्या विहिरीत सकाळी दहाच्या सुमारास पोहण्यास गेले होते. त्यावेळी विहिरीत सुमारे तीस ते चाळीस फूट पाणी होते. पोहताना शिवराज व शुभम हे पाण्यात बुडू लागले. हे पाहताच सोबत आलेल्या मुलांनी भीतीने पळत जाऊन ही घटना घरात सांगितली. त्यानंतर घरातील व शेजारी विहिरी जवळ गेले असता त्यांना विहिरी शेजारी दोघांच्या चपला व कपडे असल्याचे लक्षात आले. पण दोघे पाण्यात दिसत नव्हते. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले. स्थानिक नागरिकांनी पाण्यात ऊडी मारून व गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांचा शोध लागला नाही. दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर व्हाईट आर्मीचे निखिल लंबू व अजिंक्य सातपुते तसेच गनिमी कावाचे प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शरद भोसले, सागर मोरे तसेच स्थानिक नागरिक शशिकांत नलवडे, नथुराम तेली, संतोष निपाणिकर, संदीप सांगलेकर, शैलेंद्र सांगलेकर, सुहास जगताप, बाळू जंटली यांच्या प्रयत्नाने गळाच्या साहाय्याने दुपारी पावणे तीनच्या सुमारास शुभम याचा तर तीनच्या सुमारास शिवराज याचा मृतदेह बाहेर काढण्यास त्यांना यश आले.
याठिकाणी कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पवार व तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे, बाजीराव केकरे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद उपस्थित होते. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. शुभम लक्ष्मण पाथरवट याला आई, एक भाऊ तर शिवराज साळुंखे याला आई, वडील, एक भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. रंगपंचमी दिवशीच दोन्ही कुटूंबात रंगाचा बेरंग झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.