डॉ. सोनल धामणकर यांचे प्रतिपादन : लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे रक्तदान शिबिर
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या देशात प्रत्येक तीन मिनिटाला एक अपघात होत असतो. कर्करोगाचे रुग्ण, प्रसूती यासह इतर आजारांमध्ये रक्ताची क्षणोक्षणी आवश्यकता भासते. नुकतेच जगाने कोरोनाचे मोठे वादळ सहन केले. यामुळे सध्या रक्ताची गरज भासत आहे. एका रक्तदानातून आपण तीन व्यक्तींचा जीव वाचवत असतो. कोणाचे तरी आयुष्य आपल्या एका रक्तदानाने फुलणार असते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीला रक्तदानाद्वारे समाजाचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध असते. या संधीचे आपण समाजासाठी सोने केले पाहिजे, असे विचार स्त्री रोगतज्ञ डॉ. सोनल धामणकर यांनी क्यक्त केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे लोकमान्य रंगमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. धामणकर बोलत होत्या. व्यासपीठावर केएलई हॉस्पिटलच्या बाल कर्करोगतज्ञ डॉ. अभिलाषा संपगार, लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सेवंतीलाल शाह, प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, अनिल चौधरी, सुबोध गावडे उपस्थित होते.
100 हून अधिकांचे रक्तदान
रक्तदान शिबिरात 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. केएलई ब्लड बँकेने रक्त संकलन केले. यावेळी डॉ. अभिलाषा संपगार यांनी लोकमान्यच्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून यापुढेही असे उपक्रम राबवावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. संचालक पंढरी परब यांनी स्वागत केले. संचालक अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगे, डॉ. विठ्ठल माने यांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी व साहाय्यक रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील यांनी उपस्थित संचालकांचे स्वागत केले. सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. यावेळी लोकमान्यचे सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरूंग, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे नितीन कपिलेश्वरी, शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, परशुराम माळी, मकरंद बापट, अशोक केळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकांनी आरोग्याची जबाबदारी घेणे गरजेचे – किरण ठाकुर
लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले, समाजसेवेचे व्रत घेऊन टिळकवाडी सेवा संघाची निर्मिती झाली. या सेवा संघाच्या माध्यमातूनच लोकमान्य संस्था उभी राहिली. रुग्णवाहिका, शववाहिकांच्या माध्यमातून बेळगावकरांना लोकमान्य सेवा पुरवत आहे. लोकमान्यने मुंबईपासून कणकुंबीपर्यंत अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा पुरविल्या आहेत. कोरोनामुळे प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.