प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील परशुराम ते तळेकांटे या 76 किलोमीटरमधील दोन टप्प्याचे काम रखडले आहे. यासंदर्भात आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यानुसार तातडीने 30 सप्टेंबर रोजी कंत्राटदार कंपन्या, मुख्य अभियंता आणि जिल्हाधिकाऱयांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील या दोन टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम 2016 पासून सुरू आहे. 2016 पासून परशुराम ते खेरशेत रस्त्याचे काम चेतक एंटरप्राईझेस लिमिटेड ही कंपनी करत होती. मात्र कंपनीने अर्धवट सोडल्याने ते काम ईगल कंपनीकडे हस्तांतरित केले आहे. एमईपी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीनेसुद्धा खेरशेत ते तळेकांटेपर्यंतचे काम अर्धवट सोडले असून सध्या या कामाची वर्कऑर्डर सबारी इंजिनिअरिंग कंपनी आणि हॅन इन्फ्रा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना दिली आहे.
दोन्ही टप्प्यातील कामे अन्य कंत्राटदार कंपन्यांकडे हस्तांतरीत करण्यात आलेली असली तरी सध्या कामाच सुरुवात झालेली दिसून येत नाही. त्यामुळे आमदार शेखर निकम यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन रखडलेल्या महामार्गाबाबत माहिती दिली. मंगळवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर भरणे यांनी प्रमुख अभियंता, कंपन्यांचे व्यवस्थापक, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बुधवारी तातडीने बैठक आयोजित केली आहे.