रजनी मक्कल मंद्रम पक्षाचे विसर्जन – जनसेवा करत राहणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांनी सोमवारी स्वतःचा राजकीय पक्ष ‘रजनी मक्कल मंद्रम’चे अस्तित्व संपुष्टात आणले आहे. राजकारणात कधीच न परतण्याचा माझा विचार आहे. हा निर्णय पक्षातील सर्वांसोबत चर्चा करूनच घेतला असल्याचे रजनीकांत यांनी पक्षाच्या पदाधिकाऱयांना उद्देशून म्हटले आहे. रजनीकांत यांची नवी संघटना आता ‘रजनी फॅन क्लब असोसिएशन’ या नावाने जनसेवेचे काम करणार आहे.
29 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थाचा दाखला देत स्वतःला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवण्याची घोषणा केली होती. निवडणुकीत न उतरता लोकांची सेवा करणार असल्याचे त्यांनी तमिळ भाषेत लिहिलेल्या एका पत्राद्वारे जाहीर केले होते. रजनीकांत अलिकडेच अमेरिकेतून उपचार करवून घेत परतले आहेत. डॉक्टरांनी त्यांना स्टंट सीन न करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रकृती अस्वास्थ असूनही राजकारणात उतरण्याची घोषणा करत शुरता दाखविणार नाही. स्वतःच्या समथंकांनाही त्रास देऊ इच्छित नाही. या निर्णयाने चाहत्यांना निराशा झाली, परंतु मला क्षमा करा असे रजनीकांत यांनी पत्रात नमूद केले होते. रजनीकांत यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली होती. पण अचानकपणे त्यांनी प्रकृतीचा दाखला देत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले होते.
प्रकृती अस्वास्थ
रजनीकांत यांना 25 डिसेंबर रोजी रक्तदाबाची समस्या आणि थकवा जाणवत असल्याने हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. डॉक्टरांनी रजनीकांत यांना 7 दिवसांपर्यंत बेड रेस्ट, किमान शारीरिक हालचाली आणि कोरोनापासून वाचण्याचा सल्ला दिला होता. तत्पूर्वी 3 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी नवा पक्ष स्थापन करून 2021 मधील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती.