अध्याय तेरावा
संसारवृक्ष हा अतिशय पुरातन असून त्याच्या वासनारूपी मुळय़ा जमिनीत घट्ट रुतून बसलेल्या असतात आणि तो उभा आडवा फोफावत असतो. जोपर्यंत त्या संसारवृक्षाचे छेदन होत नाही म्हणजे वासना संपत नाहीत तोपर्यंत ईश्वरप्राप्ती होत नाही हे लक्षात घेऊन संसारवृक्षाचे छेदन करण्यासाठी सत्वगुणाची वाढ करावी म्हणजे वैराग्य प्राप्ती होते असं भगवंतांनी उद्धवाला सांगितलं. वैराग्य म्हणजे अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं. नामस्मरण, हरिकथा, कीर्तन श्रवण, हरीच्या चरित्रातील प्रसंगांचे चिंतन, सद्गुरूंची सेवा, म्हणजे त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन, तसेच गायत्री उपासना आदि उपायांनी सत्वगुणाची वृद्धी होत आहे हे लक्षात घेतले असते. जसजसा सत्वगुण वाढत जातो तसतसे तम व रजोगुण नामशेष होत जातात. एव्हढे सांगून झाल्यावर भगवंत म्हणाले, तमोगुणाची वाढ कशी होते हेही सांगतो कारण माणसाने कोणत्या वाटेला जाऊ नये हे समजले की, तो आपोआपच सावध होईल. तमोगुणाचे शास्त्र व्यभिचारी असते. त्यात दारू, मद्य, ताडी हटकून ग्रहण केले जाते. द्वेष, जुगार किंवा परदारा, ही दुर्व्यसने असतील तेथेच तमोगुणाची कायमची बैठक असते त्या कर्माचा आरंभ म्हणजे जारण, मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटन किंवा वशीकरण यातून होतो. हे सर्व कर्म तामस होय असे समज.
असा पुरुष क्रोधयुक्त होऊन निरंतर शत्रूचाच ध्यास घेतो व त्याचा घात करावयालाच उद्युक्त असतो. त्याचे मंत्र तामसी असतात आणि देवता पाहिल्या तर मुकी, मैळी (घाणेरडी), उष्टी, चांडाळीण किंवा प्रेताची देवता कंकाळी म्हणून असते. त्यांची मंत्रयोजनाही अशीच! दगडमातीचा संस्कार करून बांधलेले घर माझे, ही जमीन माझी, हाच निरंतर ध्यास. निजल्यावर स्वप्नातसुद्धा भिंती घालीत असतो, एवढी घराची आसक्ती !
घर बांधण्याचे सामर्थ्य नसले, तरी त्या बखळीच्या आत नेहमी दगडमाती राखीत असतो. ज्या देहासाठी घर बांधावे लागते, त्या देहालाही तो दुःसह कष्ट देत असतो. तामस संस्काराच्या योगाने घराच्या आसक्तीने तो केवळ वेडाच बनलेला असतो. गृहाच्या लोभाची खटपट तो मरेपर्यंत सोडीत नाही, तोच त्याचा तामस संस्कार होय आणि त्यामुळे त्याच्या संसाराची माती होते. आता राजसाचे स्वरूप ऐक. त्याचे स्वरूप याच्याहून निराळे असते. हा पुढून चावरा आणि मागून लाथा मारणारा असा असतो. जी शहाणी आणि व्यभिचारी स्त्री असते, ती आपल्या पतीचे मन प्रसन्न ठेवते आणि मग त्याला फसवून व्यभिचाराकरिता बाहेर जाते. त्याप्रमाणेच हा रजोगुण आहे. ज्याप्रमाणे एखादे अडेल तट्टू दिसायला मोठे छान दिसते, पण रस्त्यामध्ये अडते आणि आडवाटेत शिरते. मग काही केले तरी पुढे पाऊल म्हणून टाकत नाही, मागे मागेच सरू लागते त्याप्रमाणेच रजोगुणाची स्थिती आहे. त्यामध्ये कल्पान्त येऊन ठेपला तरी त्याग घडण्याचा संभव नाही. असा मनुष्य धर्म करतो, तो केवळ दांभिक भावानेच करतो आणि मनात कामाची आसक्ती असते. सोबतीने चालत असलेला चोर, सर्वस्व लुटण्याकरिता चाकर होऊन बरोबर धावत असतो.
त्याचप्रमाणे रजोगुणाचाही प्रकार आहे. तोही इच्छेचा संसार वाढवीत असतो. त्यामुळे मनुष्य कामाच्या आसक्तीने धर्म करतो, केलेले कर्म निश्चयपूर्वक उपभोगून घेतो आणि त्यामुळे तो स्वतःलाच जन्ममरणाच्या भोवऱयात पाडतो. कधी कल्पांतीसुद्धा त्यातून सुटत नाही. सात्त्वीक लोक माझ्या भजनाने तरून जातात. तामस असतात ते माझ्या विरोधभक्तीने तरून जातात. परंतु राजसांचे जन्ममरणातील भ्रमण रजोगुणामुळे कधीच सुटत नाही.
रजोगुणाची वाढ ज्याच्या योगाने प्रबळ होते, ती दहा लक्षणे तुला सांगतो. काम्यकल्पना निखालस सोडून देण्याकरिता हेही निरूपण ऐक.
राजस लोकांचे जे शास्त्र ते केवळ प्रवृत्तिपर असते. ते केवळ वासनामय असते. इहलोकी व परलोकी सुख मिळवून देणाऱया गोष्टीचेच राजस माणसाला नेहमीच अत्यंत आकर्षण वाटत असते.
क्रमशः