भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रणजी स्पर्धेकडे दुर्लक्ष केले तर भारतीय क्रिकेट कणाहिन होण्यास अजिबात वेळ लागणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. बीसीसीआयने यंदाची रणजी स्पर्धा दोन टप्प्यात होईल, असे जाहीर केले, त्याआधी तासाभरापूर्वी शास्त्री यांनी याबाबत ट्वीट केले.
‘रणजी क्रिकेट स्पर्धा हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे आणि या स्पर्धेकडेच दुर्लक्ष करणे सुरु केले तर भारतीय क्रिकेट कणाहिन होण्यास वेळ लागणार नाही’, असे शास्त्री आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
मागील वर्षी रणजी चषक स्पर्धा होऊ शकली नव्हती. स्थानिक प्रथमश्रेणी हंगामात विजय हजारे चषक व सईद मुश्ताक अली चषक अशा दोनच स्पर्धा घेण्यात आल्या. गतवर्षी रणजी स्पर्धा होऊ शकली नाही, यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी बीसीसीआयने पूर्ण सामना शुल्कापैकी 50 टक्के रक्कम रणजीपटूंना अदा केली होती.