पुणे / प्रतिनिधी
पुण्यातील गहुंजे मैदानावर पार पडलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राने ओडिसाचा 10 गडी राखून शुक्रवारी बावन्नकशी विजय मिळवला. महाराष्ट्राने घेतलेल्या 250 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना आज दुसऱयात डावात ओडिसाच्या गोविंद पोतदार याची शतकी खेळी आणि अनुराग सारंगीची अर्धशतकी खेळी वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. त्यामुळे दुसऱया डावात ओडिसाने 289 धावा करत महाराष्ट्रावर नाममात्र 39 धावांची आघाडी घेतली. हे आव्हान महाराष्ट्राने सहज पार करत 10 विकेटने विजय संपादन केला. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरी, सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी 4 गडी, तर अक्षय पालकर याने 2 गडी बाद करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
पहिल्या दिवशी नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राने जिंकला आणि कर्णधार अंकित बावणे याने ओडिसाला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. पहिल्या डावात ओडिसाने राजेश धुपेरचे शतक आणि शंतनू मिश्रा याचे अर्धशतकाच्या जोरावर ओडिसाने 293 धावा केल्या. याला उत्तर देताना महाराष्ट्राकडून अंकित बावणेचे द्विशतक ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख यांची शतकी खेळी आणि राहुल त्रिपाठी आक्रमक अर्धशतक याच्या जोरावर महाराष्ट्राने 543 धावांचा डोंगर उभा करत ओडिसावर 250 धावांची भक्कम आघाडी घेतली.
याला उत्तर देताना ओडिसाचा दुसरा डाव आज 289 धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी व सत्यजित बच्छाव यांनी भेदक मारा करीत ओडिसाचे कंबरडे मोडले. गोविंद पोतदार याने शतक केले. मात्र, इतरांची तितकीशी साथ न मिळाल्याने ओडिसाला महाराष्ट्रावर 39 धावांची नाममात्र आघाडी घेता आली. या माफक आव्हानाचा पाठलाग महाराष्ट्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी कोणतीही पडझड होऊ न देता सहज करत महाराष्ट्राचा विजय पक्का केला.