मुंबई / वृत्तसंस्था
यंदाची रणजी चषक, कर्नल सी. के. नायुडू चषक व वरिष्ठ महिला गटातील टी-20 स्पर्धा लांबणीवर टाकत असल्याची घोषणा बीसीसीआयने केली. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे रणजी चषक स्पर्धा व सी. के. नायुडू चषक स्पर्धा याच महिन्यात सुरु होणे अपेक्षित होते तर महिला टी-20 लीग फेब्रुवारीमध्ये आयोजित केली गेली होती.
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडू, सहायक पथकातील सदस्य, सामनाधिकारी व अन्य सहभागी सदस्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करु इच्छित नाही. त्यामुळे, या तिन्ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर परिस्थिती पाहता पुढील निर्णय घेण्यात येईल’, असे बीसीसीआयने पत्रकातून नमूद केले. 2021-22 स्थानिक हंगामात 11 स्पर्धांच्या माध्यमातून जवळपास 700 सामने होणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यातील 3 स्पर्धा लांबणीवर टाकले गेले आहेत.