गोवा कला अकादमी आयोजित 53व्या ‘ब’ गट मराठी नाटय़स्पर्धेत शुक्रवारी वारखंड पेडणे येथील श्री शांतादुर्गा सांस्कृतिक व क्रीडा संघाच्या नाटय़कलाकारांनी सांखळी येथील रवींद्र भवनातील स्व. मनोहरबुवा शिरगावकर नाटय़गृहात प्रसिद्ध नाटककार विश्वास पाटील यांचे ‘रणांगण’ हे ऐतिहासिक नाटक सादर करून उत्तम समन्वयाचे दर्शन घडविले. तब्बल तीन डझनांहून अधिक कलाकारांना रंगमंचावर आणून त्यांच्याकडून रंगकार्य घडवून आणणे, ही खचितच सोपी गोष्ट नाही…
या नाटकाचे लेखक विश्वास पाटील हे भारतीय प्रशासनिक सेवेतील निवृत्त अधिकारी. शासकीय व्याप सांभाळून लिहिलेल्या महानायक, पानिपत, पांगिरा, नागकेशर, क्रांतीसूर्य, महासम्राट, संभाजीसारख्या कितीतरी कादंबऱया, विविध साहित्यकृती, चित्रपट इत्यादी त्यांच्या नावावर आहेत.
‘रणांगण’ हे नाटक पानिपतच्या तिसऱया युद्धावर बेतलेले आहे. पेशव्यांच्या समूळ उच्चाटनासाठी बादशहा अहमद शाह अब्दाली कट रचतो. याचा सुगावा लागताच भाऊसाहेब पेशवे कोवळय़ा विश्वासरावांसह मल्हारराव होळकर, जंकोजी शिंदे हे पराक्रमी सरदार तसेच लाखो सैनिक, हत्ती, घोडे यांच्यासह दिल्लीकडे कूच करतात. पानीपतच्या लढाईत यश पेशव्यांच्या समोर असते. दुर्दैवाने सैन्याना पुरविली जाणारी रसद, जनावरांसाठीचे खाद्य आणि पाणी अडविण्यात अहमद शब्दालीच्या माणसांना यश मिळते. परिणामी पेशव्यांचे सैन्य उपाशी पोटी युद्ध करतात. इकडे नानासाहेब पेशव्यांना परिस्थितीची कल्पना दिली जाते. त्यावेळी चाळीस हजार सैन्य घेऊन ते भाऊसाहेबांच्या मदतीला येतात परंतू वाटेत त्यांना दुर्बुद्धी सूचते एका नऊ वर्षीय मुलीशी ते विवाह करतात आणि तिथेच आनंद साजरा करतात. तोपर्यंत पानिपतच्या लढाईत पेशव्यांचे हजारो सैनिक मारले जातात. पेशवे युद्ध हरतात.
पेशवाईतील अंतर्गत दुफळी, पेशव्यांसाठी काम करणारे मुस्लीम सरदार इब्राहीमखान गारदी यांच्या सूचनाकडे आणि युद्ध नियोजनाकडे केलेले दुर्लक्ष, अहमद शब्दालीचा गनिमी कावे रचण्यात प्रवीण असलेला सरदार नजिब याची दुष्कृत्ये कटकारस्थानाने केलेला दत्ताजी शिंदेचा वध, सौख्यविलासात मग्न झालेले नानासाहेब पेशवे स्त्री हट्ट या गोष्टीमुळे क्षमता असूनदेखील पेशवाई संपली, मातीमोल झाली हा इतिहास नव्याने या नाटकाच्या माध्यमातून लेखकाने उगाळला आहे.
या नाटकातील प्रमुख भुमिकामध्ये कुलदिप परब (सदाशिवभाऊ) रत्नदिप धारगळकर (इब्राहीम गारदी), स्वप्नील सावंत (विश्वासराव पेशवे), राजीव सावंत (अहमद शब्दाली), प्रदीप परब (नजीब), आनंद परब (मल्हारराव होळकर), प्रसाद ठाकूर (नानासाहेब पेशवे), रामदास सावंत (दत्ताजी शिंदे) आदींनी आपल्या भुमिका जबाबदारीने पार पाडल्या. महिला कलावतीमध्ये अनिता मोरजकर (गोपिकाबाई), लक्ष्मी सातार्डेकर (पार्वतीबाई), शुभदा जाधव (भागिरथी) यांनी भुमिका उचितरित्या पार पाडल्या. मुख्य म्हणजे सगळय़ा पात्रांचे पाठांतर चोख होते.
या नाटकाला लोकनाटय़ाची किनार होती. गारदी झालेले अमित परब, सखाराम परब, संभाजी परब व रत्नेश परब यांनी नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून खूप चांगले रसिकरंजन केले. खास करून त्यांचे पदलालीत्य आणि नृत्यविष्कार टाळय़ा घेऊन गेला. एकाच दिशेने जाणाऱया नाटय़ाला नृत्य गायनाचा साज चढविण्याचे आणि त्याद्वारे नाटकात वेगळेपणा निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला.
नाटकातील सगळे मॉब सीन दाद देऊन गेले. कारण एकाचवेळी वीस-बावीस कलाकारांना रंगमंचावर वावरताना कसलीच अडचण अथवा बाधा आल्याचे जाणवले नाही. त्यासाठी युद्धदिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक यांचे अभिनंदन.
नाटकाचा कालावधी हा तीन तासांचा तरी तो वाढणार नाही किंवा स्पर्धेत नियमबाह्य़ काही घडणार नाही याची काळजी संस्थेच्या कलाकार स्पर्धकांनी घेतली हे विशेष होय. दीपक बर्वे यांची प्रकाशयोजना चांगली होती. परंतू अनेक ठिकाणी ती विसंगत वाटली. बऱयाचवेळा स्पॉटलाईट अपेक्षित ठिकाणी पडत नव्हती. जितेंद्र परब यांची रंगभूषा चांगली होती. मात्र केशभूषा खास करून भटजी झालेल्यांचे टोप डोक्याला व्यवस्थित चिकटतील यावर लक्ष हवे. मात्र एकदम 30-40 कलाकारांना रंगविणे ही कठीण गोष्ट आहे. वेषभूषा अप्रतिम होती. सगळय़ांच्या वेषभूषेकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे जाणवले. त्यासाठी बाबाजी घाडी प्रशंसेस पात्र आहेत.
सत्यवान नाईक यांनी पार्श्वसंगीतासाठी वापरलेले गायन वादनाचे ध्वनी परिणामकारक होते. युद्धसदृष्य परिस्थिती, श्रीमंतांचे आगमन, घोडय़ांच्या टापांचा आवाज, रणशिंग, शंखनाद वातावरण निर्मितीसाठी सुयोग्य वाटला. काही अपवाद वगळल्यास पार्श्वसंगीत चांगले होते. यावर्षी पेडणे तालुक्यातून एकूण पाच नाटके स्पर्धेमध्ये होती. पैकी स्पर्धेत चार नाटके सादर होतील आणि सादर होणारी चारही नाटके ऐतिहासिक आहेत हे विशेष होय.
‘रणांगण’ नाटकात ब्लॅकआऊटच्यावेळी पडद्यामागील कलाकारांची उडणारी तारांबळ, धावपळ रसिकांना दिसली नाही पाहिजे. कारण नाटक स्पर्धात्मक आहे. त्यावर दिग्दर्शक प्रदीप परब यांचे लक्ष हवे. बऱयाच ठिकाणी दिग्दर्शकाची कल्पकता आणि डोळसपणा दिसला. तरी नाटकात त्रुटी राहणार नाहीत याची काळजी हवी. नाटकातील राजेंद्र नाईक यांचे नेपथ्य सूचक होते. वातावरण निर्मितीस योग्य होते. एकूण सगळय़ा पात्रांच्या समन्वयामुळे एक नीट नेटका प्रयोग रसिकांना पहावयास मिळाला.