प्रतिनिधी / मडगाव
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने आज साहित्य, नाटय़, चित्रपट क्षेत्राला मोठा धक्का बसल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
रत्नाकर मतकरीचे साहित्य व नाटकाच्या रूपाने या चमकत्या ताऱयाचा प्रकाश भावी पिढीला मिळत राहिल. चार दिवस प्रेमाचे, दुभंग, अश्वमेध, जावई माझा भला अशी अनेक नाटके, नाटय़ रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. अलबत्या गलबत्त्या, निम्मा शिम्मा राक्षस अशा बालनाटय़ांनी त्यांनी लहान मुलांच्या हृदयातही स्थान निर्माण केले होते. त्यांची अनेक नाटके पाहण्याचा मला योग आला. गोमंतकीय हौशी व उत्सवी रंगभूमीला त्यांच्या नाटकांमुळे योगदान लाभले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबिय तसेच रसिकांना माझ्या सहवेदना कळवितो असे कामत यांनी म्हटले आहे.