पोलिसांकडून गुन्ह्याचा कसून तपास, शंभरहून अधिकजणांनी केले परदेशी कॉल
संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील आठवडा बाजार येथून लॅपटॉपच्या माध्यमातून शंभरहून अधिकजणांनी आंतरराष्ट्रीय कॉल केल्याचे समोर आले होते. यामधील काही कॉल हे पाकिस्तानातही केले गेले आहेत त्यामुळे आता संशयास्पदरित्या आंतरराष्ट्रीय कॉल नेमके कुणी केले, कशासाठी केले, या संदर्भात पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. यातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
शहरातील आठवडा बाजार येथील सायबर पॅफेमधून आंतराष्ट्रीय कॉल केले जात होत़े विशेषतः पाकिस्तानात हे कॉल करण्यात आल्याने पोलिसांच्या यंत्रणा सतर्क झाल्या. मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला या कॉल्सची माहिती मिळताच त्यांनी रत्नागिरी पोलिसांना सूचित केले होते. रत्नागिरी पोलिसांकडून कारवाई करत 2 जणांना अटक केली तर 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यात सायबर कॅफे चालक अलंकार अरविंद विचारे (38, रा. छत्रपतीनगर रत्नागिरी), फैजलरझा अगिरझा सिद्धीकी (33, रा. नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर यातील तिसरा आरोपी अर्शद नवाझ हा बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान शहराच्या मुख्य बाजारपेठेत चालणाऱ्या या प्रकाराची वेळीच माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही, या बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सायबर कॅफे चालवताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र परवाना नसतानाही अनेक सायबर कॅफे बिनबोभाट सुरू आहेत. यामधून देखील शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे. याबाबत कारवाई केव्हा होणार, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायबर कॅफे सुरू आहेत. तसेच यात शासनाकडून रितसर परवानगी न घेताही हे सायबर कॅफे चालवले जात आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अन्य किती ठिकाणी अवैधरित्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात येतात, याबाबत पोलिसांकडून आता चौकशी करण्यात येत आहे. लॅपटॉपवरून करण्यात येणारे हे कॉल सामान्यपणे ट्रेस होत नसल्याने देशविघातक कृत्यांसाठीही याचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या कॉल्सचे पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे.
यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यात देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयिताला आश्रय दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यासाठी राज्याचे दहशतवादविरोधी पथक रत्नागिरीमध्ये येवून चौकशी करून गेले होत़े त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा होण्याकडे वाटचाल करत आहे, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
गुन्ह्याचा प्रत्येक अँगल तपासून पाहणार
रत्नागिरीमधून आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणी प्रत्येक अँगल पोलिसांकडून तपासला जाणार आह़े तसेच यातील संशयित आरोपींचा नेमका काय रोल आहे, हे देखील पडताळून पाहिले जाईल.
– डाॅ. मोहितकुमार गर्ग (जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी)