प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर विश्राम ऊर्फ बाळ भिसे (78) यांचे शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. बाळासाहेब हे पत्रकारितेचे एक वैभवशाली पर्व होते. त्यांच्या एक्झीटने रत्नागिरीच्या पत्रकारितेतील एका झळाळत्या शैलीदार लेखणीचे पर्व दूर झाल्याची उणीव निर्माण झाल्याने पत्रकार वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे.
भिसे यांचा रत्नागिरीतील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर काही काळ स्वतःचे क्लासेस चालवले. मुंबईत 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर रत्नागिरीत शिवसेनेची शाखा सुरू करण्यासाठी माजी आमदार आप्पा साळवी अन्य कार्यकर्त्यांच्या बरोबरीने भिसे यांनी त्यात सहभाग घेतला. त्या काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रत्नागिरीत दौरा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
मुंबईतील दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे रत्नागिरीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही काळ काम केले. रत्नागिरीत त्यांनी आरसा मुद्रणालय सुरू केले. तेथूनच ते दैनिक नवकोकण आणि साप्ताहिक आरसा ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करत असत. त्या वृत्तपत्रांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले. रत्नागिरीतील अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून संपादनाद्वारे पत्रकारितेतील प्रखर वास्तवता व निर्भेळ निरपेक्ष सत्य जनमानसासमोर मांडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असे. त्यांचा ‘आरसा’ साप्ताहिक हा खरोखरच रत्ननगरीचा कला, सास्पृंतिक, सामाजिक व काही प्रमाणात राजकीय स्थित्यंतराचा आरसाच होता. बाळासाहेबांनी या माध्यमातून अनेक हातांना व मनांना लिहिते केले. त्यांच्या लेखणीतून साप्ताहिक व वृत्तपत्राचे हजारो पालम अक्षरमय झाले आहेत. बाळासाहेब भिसेंच्या एक्झीटने रत्नागिरीच्या पत्रकारितेतील एक झळाळती शैलीदार लेखणीचे पर्व दूर झाल्याची उणीव यापुढेही आठवत राहील, अशा भावना पत्रकारांतून व्यक्त करण्यात आल्या. भिसे यांच्या निधनाने रत्नागिरी व पत्रकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.