अंबानींच्या किचनची गोडी..!
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केरळनंतर महाराष्ट्रात व विशेष म्हणजे रत्नागिरीतील भाटय़े नारळ संशोधन केंद्राने नीरेपासून मधुमेह रूग्णांसाठी अत्यंत उपयुक्त साखर बनवण्याच्या संशोधनात मोठी कामगिरी नोंदवली आहे. या संशोधन केंद्रात नीरेपासून बनवलेली साखर थेट अंबानी कुटुंबियांच्या किचनमध्ये पोहोचली आहे. एकदा नाही तर दोनदा अंबानी कुटुंबियांकडे ही साखर पाठवण्यात आल्याची माहिती कृषी विद्यावेत्ता वैभव शिंदे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
जगात उद्योग क्षेत्रातील अग्रेसर नाव म्हणजे अंबानी ग्रुप होय. काही दिवसांपूर्वी अंबानी ग्रुपचे सत्यजित भोसले रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी भाटय़े नारळ संशोधन केंद्राला भेट दिली होती. यावेळी नीरा व त्यापासून साखर उत्पादनाबाबत त्यांना माहिती मिळाली. नीरा आणि त्या पासून बनवलेला पदार्थ आरोग्यदायी असल्याचे कळताच त्यांनी त्वरित त्यावेळी उपलब्ध नीरा साखर विकत घेतली. दुसऱया दिवशी ही साखर थेट अंबानी कुटुंबियांच्या किचनमध्ये गेली. त्यानंतर दुसऱयांदाही अंबानी कुटुंबियांकडून आलली नीरा साखरेची मागणी पूर्ण करण्यात आली.
नारळापासून विभिन्न मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात. त्यापैकी नीरा नावीन्यपूर्ण पदार्थ आहे. नीरा हे पेय नारळाच्या नवीन बंद पुष्पसंभारापासून काढले जाते. त्यामध्ये साखर केवळ 14 ते 18 टक्के असते. नीरेमध्ये साखरेचा ग्लाईसेमिक निर्देशांक (35) एवढा कमी असल्यामुळे मधुमेह असणाऱया व्यक्तीस ही नीरा आरोग्यदायी मानली जाते. नीरा पेय म्हणून वैद्यकीय दृष्टय़ा खनिज जलापेक्षा चांगले असल्याचे सिध्द झाल्याची माहिती कृषी विद्यावेत्ता वैभव शिंदे यांनी दिली.
नीरा भारत, श्रीलंका, आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड व म्यानमारमध्ये मोठय़ा प्रमाणात सेवन केली जाते. महाराष्ट्रात नीरा उत्पादन करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. नीरा सूर्योदयापूर्वी काढायची असते. सूर्योदयानंतर नीरा काढल्यास त्याचे गुणधर्म बदलतात व त्याला ताडी किंवा माडी म्हणतात. सूर्योदयापूर्वी काढलेली नीरा आरोग्यदायी असते. याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतल्यास यातून मोठी रोजगार निर्मिती होवू शकते. याचे प्रशिक्षण भाटय़े संशोधन केंद्रात दिले जाते. तरूणवर्गांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभव शिंदे यांनी केले आहे. नीरा तापवली की आधी मध तयार होते. त्यानंतर पुन्हा मध तापवायचे. त्यापासून साखर तयार होते. ही साखर मधुमेह रूग्णांसाठी वरदान ठरत आहे. या साखरेचा सर्वाधिक वापर केरळ राज्यात केला जातो, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.
रत्नागिरीतच मोठे मार्केट तयार करण्याचा प्रयत्न
रत्नागिरीतील टिळक आळी येथील तुषार आग्रे या तरूणांने नीरेपासून साखर उत्पादनाचे प्रशिक्षण भाटय़े संशोधन केंद्रातून घेतले असून आता तो स्वत: काही प्रमाणात साखर बनवतो आणि उर्वरित साखर केरळमधून आणून विकतो. भविष्यात रत्नागिरीतच याचे मोठे मार्केट तयार करण्याचा प्रयत्न करेन, असे तुषार आग्रे यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले.
नीरा उत्पादन परवानगी प्रक्रिया किचकट
नीरा उत्पादन परवानगी प्रक्रिया खूप किचकट असल्याने व याला त्वरित परवानगी मिळत नसल्याने या उत्पादनाकडे कोणी वळत नसल्याची माहिती समोर आली आहे. नीरेऐवजी माडी बनवणाऱयांची संख्या जास्त असून या परवानगीचा गैरवापर होण्याची भीती प्रशासनाला असल्याने ही परवानगी लवकर दिली जात नाही.