प्रतिनिधी / रत्नागिरी :
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्हय़ात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी रत्नागिरीतून शुक्रवारपासून ‘लालपरी’ धावणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून बाहेर जाण्याची रितसर परवानगी घेतलेल्या 1 हजार 611 व्यक्तींना रत्नागिरी डेपोच्या बसमधून त्यांच्या जिल्हय़ात सोडले जाणार आहे. गडचिरोली-गोंदीयापासून विविध जिल्हय़ांमध्ये तिकीट आकारून या लोकांना सोडण्याचे नियोजन रत्नागिरी एस्टी विभागाने केल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे गेले 2 महिने काम नाही, आर्थिक उत्पन्न नाही म्हणून जिल्हय़ातील हजारों मजूर अगदी चालतही आपल्या गावी जाण्याच्या तयारीत होते. अशा प्रकारे जिल्हय़ात अडकलेल्या मजुर व अन्य लोकांना जिल्हयाबाहेर जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत 15 हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज केले असले तरी यातील 1 हजार 611 नागरिकांची पहिली यादी एस्टी प्रशासनाकडे देण्यात आली असून त्यांना गावी सोडण्यासाठी शुक्रवारपासून बस धावणार आहेत. जशी जशी अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहे. जे स्वखर्चाने आपल्या गावी जावू शकतात अशांची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
जिल्हयात सध्या सिंधुदुर्गपासून गोंदियापर्यतचे मजूर व अन्य लोक अडकले आहेत. त्यांच्या परतीसाठी एस्टीने नियोजन केले असून एका बसमध्ये केवळ 21 ते 22 प्रवासी नेण्यात येणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र व प्रवास करण्यास अनुमती असल्याचे सक्षम प्राधिकऱयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करण्याचे कामही प्रशासनाकडून केली जात आहेत.
प्रत्येक बस निर्जुंतूक करण्यात येणार आहे. नागरिकांनी बसच्या प्रवासामार्गापासून मधेच कुठेही उतरू नये केवळ मार्गस्थ ठिकाणी असलेल्या बसस्थानकातच बसेस थांबतील अन्यथा कुठेही थांबवण्यात येवू नये अशा सूचना महामंडळाकडून प्राप्त झाल्या आहेत. तसेच बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. बस सोडण्यापूर्वी यादीप्रमाणे सर्व प्रवासी आल्याची खात्री करूनच बस पुढे मार्गस्थ करावी, मार्गात बिघाड झाल्यास बसची त्वरीत कामे करावी अथवा पर्यायी बसची व्यवस्था करावी, प्रवाशाची संख्या, प्रवासभाडे, बसक्रमांक, बसचा आगार याबाबतचा तपशील नोंद करून दप्तरी ठेवण्यात यावा याबाबत भविष्यात शासनास अहवाल सादर करावा लागणार असल्याने या नोंदी अचूक होतील याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रक एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी परिपत्रकाद्वारे काढले आहेत.