लोकभावनेचीजिल्हाप्रशासनानेघेतलीदखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य सरकारने 5 टप्प्यात लॉकडाऊन उठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर समाजमाध्यमांवर रत्नागिरी जिल्हय़ातील लॉकडाऊन शिथिलतेबाबत सामान्य लोकांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाठोपाठ ‘कडक’ लॉकडाऊनमुळे मोठी आर्थिक झळ पोहोचलेल्या स्थानिक व्यापारी, दुकानदारांनी दिलेल्या मागण्यांची निवेदने, प्रतींमुळे हैराण झालेल्या जिल्हा प्रशासनाने अखेर जिल्हय़ात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हय़ात 3 ते 9 जून असा कडक लॉकडाऊन करूनही कोरोना रूग्णसंख्येतील घटीत काहीही फरक न पडल्याने जिल्हय़ातील नागरिकांमध्ये प्रचंड जनप्रक्षोभ उसळता होता. याचीच प्रशासनाने तत्काळ दखल घेतल्याची चर्चा लॉकडाऊन शिथिलतेच्या घोषणेनंतर सर्वत्र सुरू होती.
जिल्हय़ात 3 ते 9 जून असा आठवडाभर कडक लॉकडाऊन करूनही कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याचे जाणवले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावात फारसा फरक पडलेला नाही. उलट व्यापारउद्दीम, कामधंदा सर्वच बंद पडल्यामुळे आर्थिक घडीच विस्कटल्याने व्यापाऱयांसह नागरिकांमध्येही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. समाजमाध्यमांवर तर जिल्हा प्रशासनाच्या ‘कारभारा’वर अक्षरशः टीकेची झोड उठत होती. अखेर कडक लॉकडाऊनअखेरच्या पूर्वसंध्येलाच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हय़ातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याचे जाहीर केले. त्यानुसार गेले 2 महिने जिल्हय़ात लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता येणार आहे. भाजीपाला, किराणा, बँकांसह अत्यावश्यक सेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी दिले. यामुळे मेटाकुटीला आलेल्या रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्हय़ात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र शनिवार व रविवारी ‘विकेंड’ लॉकडाऊन लागू करण्यात आला असून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
कोरोना संसर्गाचा विचार करून शासनाने राज्यातील जिल्हय़ांची 5 टप्प्यांत वर्गवारी केली आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचा समावेश चौथ्या टप्प्यात आहे. कोरोनाचा पॉझिटीव्ह दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान व 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रूग्णांनी भरलेले असतील, अशा जिल्हय़ांचा समावेश या चौथ्या टप्प्यात आहे. चौथ्या टप्प्याच्या निकषानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अन्य दुकाने, मॉल, चित्रपटगृहे बंद राहतील. जिल्हय़ातील एसटी सेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेसह सुरू राहणार आहे. मात्र प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
हॉटेलची केवळ पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी वॉकिंग, सायकलिंग, खेळ यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र शनिवार व रविवार हे सर्व बंद राहणार आहे. मेडिकल व औषधे दुकाने ही सुरू राहणार आहेत. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे सार्वजनिक कार्यक्रम बंद राहतील. लग्न समारंभासाठी 25 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी जास्तित जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येईल.
अत्यावश्यक सेवांमध्ये-रूग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधे दुकाने, औषधे निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवांमध्ये सहाय्यभूत निर्मिती व वितरण युनिटससह विपेते, वाहतूकदार व पुरवठा साखळी यांचा समावेश असेल. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उद्योग व सहाय्यभूत सेवा यांचाही समावेश आहे. पशुवैद्यकीय सेवा, पाळीव प्राणी काळजीसंबंधी सर्व कामकाज.
किराणा सामान दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तीक करावयाच्या सर्व मान्सूनपूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शितगृहे व साठवणुकीची गोदाम सेवा, विविध देशाच्या परराष्ट्र संबंधविषयक कार्यालयाच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणकडून करण्यात येणारे सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व कामे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा, एसईबीआय प्राधिकृत बाजार व कार्यालये, स्टॉक एक्सेंज व संबंधित अन्य आस्थापना, दूरध्वनी संबंधित सेवा, मालाची, वस्तूंची वाहतूक, पाणीपुरवठा, कृषीविषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक शाखांमध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरूस्ती यांचा समावेश आहे.
ई-कॉमर्स (अत्यावश्यक माल आणि सेवा यांचा पुरवठा), पेट्रोलपंप व पेट्रोलियम उत्पादने, सर्व कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सींस, आयटी सेवा ज्या पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवतात, सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम सेवा, टपाल सेवा, बंदरे आणि त्या संबंधीच्या कृती, कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजींग साहित्य बनवणाऱया आस्थापना, आगामी पावसाळय़ातील वैयक्तीक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित करण्यात आले आहे.
सकाळी 9 ते 4 पेपर विक्रीला मुभा
मान्यताप्राप्त वर्तमानपत्रांनाही अत्यावश्यक सेवेमध्ये मुभा देण्यात आली असून सकाळी 9 ते 4 या वेळेत पेपर विक्री करता येणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे.