रत्नागिरी सिंधुदुर्गासह राज्यातील 15 जिह्यात दुसऱया लाटेत रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या लक्षात आले. त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी गृह अलगीकरणात असलेले अनेक लोक कोरोना नियमावलीचे पालन करीत नाहीत, असे लक्षात आले
सध्या सिंधुदुर्गात सक्रीय रुग्ण 5,400 हून अधिक आहेत. सिंधुदुर्गात आजपर्यंत बऱया झालेल्या रुग्णांची संख्या 19 हजारच्या घरात आहे. या जिह्यात 675 पेक्षा जास्त लोक मृत असून आजपर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजारहून अधिक आहे.
रत्नागिरी जिह्यात कोरोनाचा संख्यात्मक आलेख अधिक मोठा आहे. या जिह्यात आतापर्यंत 37 हजार लोक बाधित झाले आहेत. मृत्यूंची संख्या 1200 च्या वर पोहोचली आहे. दुसऱया लाटेत रत्नागिरी जिह्यात 400 ते 600 रुग्ण दररोज सापडत आहेत. रत्नागिरी जिह्यात मृत्यूदराने कहर केला आहे. राष्ट्रीय मृत्यूदराच्या जवळपास दुप्पट एवढा मृत्यूदर झाला आहे. 3.12 प्रतिशत एवढा मृत्यूदर झाल्याने तो साऱयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. रत्नागिरीतील मृत्यूदराचा मुद्दा राज्यस्तरावरदेखील दखलपात्र ठरला असून तो कमी व्हावा म्हणून काही सूचना केल्या जात आहेत.
जूनच्या 3 तारखेपासून 9 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. वैद्यकीय सेवा व अनुषंगिक व्यवस्था केवळ सुरु राहतील. बाकी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील सर्व व्यवस्था बंद राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. असा लॉकडाऊन केला म्हणजे कोरोना नियंत्रणात येईल असा समज यामागे आहे. यापूर्वी रत्नागिरी जिह्यात किराणा माल दुकाने अत्यावश्यक सेवा असली तरी 15 दिवसांहून अधिक काळ ती बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाने फर्मावले होते. किराणा माल दुकाने बंद राहल्यास रुग्णसंख्या वाढीला पायबंद बसेल असा आडाखा त्यामागे होता. तथापि, गेल्या 15 दिवसात रुग्णसंख्येने कमी होण्याचे नाव घेतले नाही.
रत्नागिरी सिंधुदुर्गासह राज्यातील 15 जिह्यात दुसऱया लाटेत रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या लक्षात आले. त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी गृह अलगीकरणात असलेले अनेक लोक कोरोना नियमावलीचे पालन करीत नाहीत, असे लक्षात आले. कोणतीही लक्षणे नसणारे रुग्ण घरीच थांबून उपचार घेऊ शकतात, या सुविधेचा दुरुपयोग केला जात आहे. अनेक लोक या कालावधीत वेगवेगळी कामे करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याचे तथ्य मांडले गेले. यामुळे 15 जिह्यातील गृह अलगीकरण बंद करण्याचे आदेश झाले. प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा अलगीकरणासाठी व्यवस्था उभारावी म्हणून सूचित करण्यात आले.
राज्य सरकारने सर्व जिह्याना सूचना दिल्या. जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱयांनी ग्राम पंचायतीपर्यंत पोहोचविल्या. अनेक ग्राम पंचायतींनी अलगीकरण केंद्रे उभी केली तर काही ग्रामपंचायती त्या प्रक्रियेत आहेत. अपेक्षित रुग्ण संख्या अशा अलगीकरण केंद्रांमध्ये पुढच्या काही दिवसात सामावून घेतली जाईल. हे लोक रोगमुक्तीपर्यंत केंद्रात थांबून उपचार घेतील आणि संसर्गाला रोखतील, अशी अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिह्यात राज्य सरकारने दिलेल्या गृह अलगीकरण बंदची अंमलबजावणी संपूर्णपणे होऊन परिणामांची वाट पाहण्याअगोदरच कडक टाळेबंदीची कार्यवाही पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाच्या मनाने घेतले. केंद्र सरकारच्या आयसीएमआर या आरोग्य विषयक शिफारशी करणाऱया संस्थेने म्हटले आहे की, टाळेबंदी हा सर्वात शेवटचा पर्याय म्हणून निवडावा. सात दिवसांच्या टाळेबंदीने फारसे काही हाती लागत नाही. कोरोनासाठी एखादी उपाययोजना सतत चौदा दिवस सुरु ठेवली पाहिजे. पण आयसीएमआरच्या सूचना सध्या गांभीर्याने घेतल्या जातात असे म्हणणे धाडसाचेच ठरत आहे. रत्नागिरी जिह्यात बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहीम व तपासणी मोहीम शास्त्रीय पद्धतीने राबवली जात नाही. एक रुग्ण तीस लोकांना बाधित करु शकतो, असे एक राष्ट्रीय स्तरावरील गृहितक आहे. म्हणजे एका रुग्णामागे तीस लोकांची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात एका रुग्णामागे पंधराचा दरदेखील नाही. सर्वप्रथम एका रुग्णामागे तीस लोकांच्या तपासणीची अपेक्षा आरोग्य विभागाने पूर्ण करणे आवश्यक आहे.
सध्या आरोग्य विभाग आणि पोलिसांकडे अतिरिक्त काम असल्याने रुग्णाशी दूरध्वनीवरुन बोलून संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी व फोन नंबर गोळा करण्याचे काम प्राथमिक शिक्षकांकडे देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षक ते काम इमानेइतबारे करत आहेत. तथापि, त्यांना उत्तरे घेण्याचे कौशल्य नसल्याने रुग्णांकडून संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे देण्यास टाळाटाळ होत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध व तपासणी करण्यात त्यामुळे अडथळे येत आहेत. फोनवरुन माहिती गोळा करणाऱया शिक्षकांना त्या कामाचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांना या कामाची कौशल्ये कोणती आणि ती आत्मसात कशी करावी, याविषयी कसलेही मार्गदर्शन देण्यात आलेले नाही. आणि थेट माहिती गोळा करण्याच्या कामाला लावण्यात आले आहे. अशावेळी अपेक्षित माहिती गोळा होत नाही आणि त्यावर उपाय शोधण्याची योजना प्रशासनाकडे नाही. रत्नागिरी जिह्यात सध्या रुग्णांची संध्या हजारोंच्या घरात असली तरी आरोग्य सेवेत नियमित काम करणारा एकही एमडी फिजीशियन नाही. असा एखादा वैद्यकीय अधिकारी किमान कोरोना साथीपुरता तरी नेमावा असे आरोग्य यंत्रणेला वाटत नाही. जिल्हा प्रशासन त्यासाठी बेताबातानेच आग्रह धरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत अनेक वैद्यकीय अधिकारी रत्नागिरी जिह्यात नियुक्त असले तरी ते बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी करत आहेत. आपत्ती काळ असला तरी या बेपत्ता वैद्यकीय अधिकाऱयांना शोधून कामाला लावण्याचा मुद्दा जिल्हा प्रशासनाच्या प्राधान्य यादीत नाही. तज्ञ व पुरेसे वैद्यकीय अधिकारी बळ असेल तर मृत्यूदर निश्चित कमी होईल, असे खासगी वैद्यकांचे मत आहे.