प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी एस.टी.विभागाचे मोठे नुकसान झाले असून 61 दिवसात तब्बल 42 कोटी 70 लाखाचे नुकसान झाले तर 22 मेपासून सुरू करण्यात आलेले जिल्हांतर्गत प्रवाशी वाहतूकीतून 9 लाख रूपये मिळाले असून जिल्हय़ात अडकून पडलेल्या 14 हजार कामगारांसाठी 600 फेऱया सोडण्यात आल्या होत्या या 600 फेऱयांचे सरकारकडून 2 कोटी येणे असून याचा प्रस्ताव विभागाने महामंडळाकडे सादर केला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
22 मार्चपासून अगदी 22 मे पर्यंत 61 दिवस रत्नागिरी जिल्हय़ातील एसटी सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या कालावधीत एस.टी चे 42 कोटी 70 लाख इतके नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या कामगारांना एस.टी ने मोफत पनवेल रेल्वेस्टेशन, पुणे रेल्वेस्टेशन, चिपळूण रेल्वेस्टेशन, रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे नेवुन सोडले यामध्ये 14 हजार 796 कामगारांचा समावेश होता. या 600 फेऱयांचे तब्बल 2 कोटी 27 लाख 20 हजार 987 रूपये सरकार रत्नागिरी विभागाला देणार असून यासंदर्भात विभागाने महामंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
22 मे पासून जिल्हांतर्गत सेवा सुरू करण्यात आली असली तरी एस.टी महामंडळ सध्या अत्यावश्यक सेवा म्हणून नागरिकांना सेवा देत आहे. मुळात यामध्ये एस.टी. ला एकही रूपया नफा नाही. प्रवाशांचे हाल होवू नये या सामाजिक बांधिलकीतून शासनाने हा निर्णय घेतला आहे. आणि एस.टी. सध्या केवळ सेवा देण्याचे काम करत असून दिवसाला 50 लाख उत्पन्न मिळायचे तिथे 50 हजार उत्पन्न जिल्हांतर्गत मिळत आहे. सोशल डिस्टस्टींग ठेवून केवळ 22 प्रवासी वाहतुक होत असली तरी तिकिटाचे दर मात्र वाढवण्यात आले नाही आहे त्या तिकिट दरात प्रवासी वाहतुक सुरू असून 22 पेक्षा कमी प्रवासी असले तरी वाहतूक सुरू असल्याचे भोकरे यांनी सांगितले.
जिल्हांतर्गत बससेवेचे 22 मे 10 जूनपर्यंतचे उत्पन्न हे केवळ 9 लाख इतके आहे. लॉकडॉऊन पूर्वी दिवसाला 50 ते 70 लाख उत्पन्न मिळत होते इतक्या नुकसानीत एस.टी सेवा बजावत असल्याचेही एस.टी विभागाने सांगितले. तिकिटचे दर वाढले असेल या गैरसमजातून प्रवाशी एस.टी ने प्रवास करत नाही तरी एस.टीचे तिकिटाचे कोणतेही दर वाढलेले नसून एस.टीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.