प्रतिनिधी / रत्नागिरी
काजूचा दर मागील ४ वर्षे सातत्याने घसरत असल्याने काजू उत्पादक शेतकरी मेटाकूटीस आला आहे. कोकणामध्ये १०० टक्के अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात काजूची लागवड करण्यात आली आहे. मात्र घसरलेले काजूचे दर व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे वाढलेल्या औषध फवारणी खर्चामुळे काजूला हमी भाव मिळावा अशी मागणी शासन दराबारी येथील शेतकरी करत आहे.
चार वर्षामध्ये एक वर्षाचा अपवाद वगळता काजू पतिकीलो ७० ते ११० रुपये किलो इतक्याच दरामध्ये खरेदी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने आफीकेतील काजूवरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे तेथील काजू ७० रुपये किलोने उपलब्ध होत आहे. यामुळे कोकणतील काजूच्या दरावर परीणाम झाला. गतवर्षी ८० ते ९० रुपये किलोने काजूची खरेदी झाली. यंदा १०० ते ११० रुपये किलोने खरेदी होत आहे. मुळातच काजुचा किलोमागे उत्पादन खर्च १२५ रुपये येतो. त्यातच औषध फवारणी व इतर कारणांमुळे हा खर्च वाढत असतो. मात्र तुलनेमध्ये मिळणारा दर तुटपूंजा ठरत असल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून काजूला हमीभाव देण्याची मागणी होत आहे.