प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील चिंचुरटी गावातील हुंबरवणेवाडीसाठी मंजूर झालेला रस्ता लोकप्रतिनिधींच्या शिफारसीमुळे रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याविरोधात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभाग कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांच्या कार्यालयासमोर हुंबरवणेवाडी ग्रामस्थानी १५ रोजी पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अध्यापही कोणतीच दखल घेण्याचे आलेली नाही. जो पर्यंत कार्यकारी अभियंता यांच्याकडून रस्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. लांजा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या माचाळ गावाच्या पायथ्याशी हुंबरवणेवाडी आहे. रस्त्या अभावी येथील जनजीवन खडतर सुरू आहे. गेली अनेक वर्ष रस्त्यासाठी येथील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधींचा या नागरिकांच्या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान २०१८-२०१९ वर्षा मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पालू-चिंचूरटी-हुंबरवणेवाडी असा रस्ता मंजूर झाला होता. मात्र लोकप्रतिनिधी यांच्या शिफारशीने मंजूर झालेला रस्ता रद्द करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे येथील ग्रामस्थ नाराज झाले असून त्यानुसार कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात हुंबरवणेवाडी ग्रामविकास मंडळ चिंचुरटी यांनी म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत पालुचे माजी सरपंच यांच्या शिफारस पत्रावरून आमदार यांनी सदरच्या रस्त्याचे काम जागा मालकाची कोणतीही तक्रार नसताना रद्द केले व त्यामुळे सद्या सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद करून पालू-चिंचूरटी-हुंबरवणेवाडी ते पालु नामेवाडी या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे असे नमूद केले आहे.
हुंबरवणेवाडीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते आहे. येथिल शालेय विध्यार्थी , रेशनिग दुकान, दवाखाना या सुविधांसाठी जाण्यासाठी ३ ते ४ किमीची पायपीठ करावी लागते आहे. रस्ता होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शासनदरबारी पत्रव्यवहार केले. त्यामुळे रस्ता मंजूर झाला होता. मात्र लोकप्रतिनिधिंच्या शिफारशीने रस्ता रद्द केला जात असल्याची गंभीर बाब नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. रस्त्याबाबत झालेली अफरातफर गेली तिन वेळा उपोषणाच्या माध्यमातून संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दिदर्शनास आणून दिलेलं आहे. मात्र याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने पुन्हा हुंबरवणेवाडी ग्रामविकास मंडळ चिंचुरटी यांनी रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.