विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
सरकारकडून केवळ मदतीचा बनाव
प्रतिनिधी / खेड
अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांची भातपिके उद्ध्वस्त होवून शेतकरी पुरता हतबल झालेला असतानाही सरकारकडून केवळ मदतीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची चेष्टा कदापीही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील नुकसानग्रस्त भातपिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावला आहे. एकीकडे शेतकरी मदतीच्या आशेने सरकारकडे आतुरतेने वाट बघत असतानाच सरकारने केवळ तुटपुंज्या मदतीची घोषणा करताना केवळ बनाव करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
कोकणातील शेतकऱ्यांची सरकारने फसवणूकच केली असून या कृत्याचा निषेध करत शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा सरकारने वचनभंगच केल्याचा आरोपही केला. सरकारने शेतकऱ्यांची चालवलेली ही चेष्टा खपवून घेणार नसून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही राहणार असल्याचेही स्पष्ट करताना कोकणातील मदतीच्या निकषात बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा दिलासा शेतकऱ्यांना दिला.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस संजय बुटाला, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, दत्तात्रय सकपाळ, विजय सकपाळ, भूषण काणे, वैभव खेडेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.