शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची माहिती
खेड नगरपरिषदेस दिली सदिच्छा भेट
प्रतिनिधी / खेड
कोकणात ज्या ज्या वेळी नैसर्गिक संकटे उद्भवली त्या त्या वेळी सरकारने आपद्ग्रस्तांना तुटपूंजीच मदत देत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील मच्छिमारांसह शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी व्यापक लढा उभारण्याची गरज असून यासाठी चळवळ उभी करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
खेड नगरपरिषदेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सारेच ठप्प झाल्याने याचा मोठा फटका आंबा उत्पादकांना बसला. वाहतूक ठप्प झाल्याने कोकणातील आंबा पाठवायचा कसा? असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. अशाही परिस्थितीत शेतकरी संघटनेने अनेकांशी संपर्क साधून आंबा पोहचवण्यासाठी हातभार लावला. मात्र, अशी वेळ पुन्हा येवू देणार नाही, यासाठी आतापासून तयारी सुरू झाल्याचे सांगितले.
कोकणातील मच्छिमारांसह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना सातत्याने अन्यायाचीच कुहाड उगारली जात आहे. अवकाळी पावसामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झालेले असतानाच सरकारने तुटपूंजीच भरपाई दिली. १० ते १५ वर्षे जपणूक केलेली झाडे चक्रीवादळात जमिनदोस्त झाल्यानंतर सरकारने केवळ झाडामागे २०० रूपये देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कोकणातील शेतकरी व मच्छिमारांना न्याय देण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असून यासाठी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुढाकार घेण्याची सूचना करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी मनसेचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक विश्वास मुधोळे, शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धारिया, तालुकाध्यक्ष पुष्पेन दिवटे, दापोली तालुकाध्यक्ष साईराज देसाई, शहराध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहर सचिव नईम चौगुले, अमोल गुहागरकर, तुषार करंजकर , संतोष पवार , जयेश गुहागरकर, अंकुश मिर्लेकर, प्रदिप भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.