प्रतिनिधी / खेड
तालुक्यात झालेल्या अवकाळी अतिवृष्टीसह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भातशेतीची तातडीने नुकसान भरपाई मिळावी, याकरिता तालुका राष्ट्रवादीने पेंढा बांधत प्रातंअधिकारी कार्यालयावर मंगळवारी शेतकरी मोर्चा काढला. कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता सर्वांना सरसरकट हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
परतीच्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची भातपिके आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी भातपिके पाण्याखाली जावून मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती येणारे संपूर्ण पिकांची नासाडी झाली आहे. भातपिकांसह अन्य पिकांचीही हानी झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यासह शेतकऱ्यांनी पेंढा बांधत मोर्चा काढला.
माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात तालुकाध्यक्ष स.तु. कदम, शहराध्यक्ष सतिश चिकणे, नगरसेवक अजय माने, मुजीब रूमाणे, आत्माराम कदम, जि.प. सदस्या सिद्धी पवार, नेहा जाधव, नफिसा परकार, युवती जिल्हाध्यक्षा दिक्षा दाभोळकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, सचिन पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.