आमदार योगेश कदम यांच्या प्रशासक व ग्रामसेवकांच्या बैठकीत सूचना
ग्रामपंचायतींना भेटी देवून तक्रारींचे करणार निवारण
प्रतिनिधी / खेड
पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवकांना सातत्याने बोलावले जात असल्याने कामे रखडत चालली असून ग्रामस्थांच्या तक्रारी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. ग्रामसेवकांना सतत पंचायत समिती कार्यालयात बोलवू नका, अशा स्पष्ट सूचना आमदार योगेश कदम यांनी पंचायत समितीत झालेल्या प्रशासक व ग्रामसेवक यांच्या बैठकीत दिल्या. तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देवून ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करणार असल्याचेही स्पष्ट केले.
सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. वेळेवर दाखले मिळत नसल्याने कामांचा खोळंबा होत असून विकासकामांचे प्रस्ताव अनेक वेळा सांगूनही मिळत नाहीत. विशेषतः नळपाणी योजना, तांडावस्ती, समाज कल्याण विभागातून मंजूर विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रस्ताव न आल्याने जनतेला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक हे महत्त्वाचे घटक असून प्रत्येक कामात ते महत्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, तरीही ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत असून ही बाब योग्य नसल्याचे ठणकावले. सर्व ग्रामसेवकांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिलेल्या दिवशी पूर्णवेळ देणे आवश्यक असून यामुळे ग्रामस्थांकडून येणाऱ्या तक्रारींना कायमचाच पूर्णविराम मिळेल. पंचायत समिती कार्यालयातील बैठकांना ब्रेक लावून ग्रामसेवकांना सातत्याने पंचायत समितीत बोलवू नये, असे आदेशही प्रशासनाला दिले.
गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्येक गावात, ग्रामपंचायत कार्यालयात जावून ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्याच्या सूचनाही केल्या. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देत ग्रामसेवकांनी यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी साऱ्यांचेच सहकार्य अपेक्षित असून सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहनही शेवटी केले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती विजय कदम, उपसभापती जीवन आंब्रे, जि.प. सदस्य अरूण कदम, गटविकास अधिकारी राऊत यांच्यासह प्रशासक व ग्रामसेवक उपस्थित होते.