प्रतिनिधी / दापोली
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यावर जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात फटका बसलेल्या वीज ग्राहकांना वीज बिलात सूट मिळणार नसल्याचे आता सरकारच्या फतव्याने सिध्द झाले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांबद्दल दापोली व मंडणगडमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दापोलीत सर्वच राजकिय पुढाऱ्यांनी याकरीता आंदोलने केली होती.
महावितरणकडे व मुख्यमंत्र्यांकडे वीज बिले कमी करण्याची मागणी करून देखील अद्याप या निवेदनांवर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यातील तोंडावर आलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणूकांना विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
दापोलीतील जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत आंदोलने केली होती. मात्र तरी देखील पशासनाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाची दखल घेतलेली दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल कमालीचे नाराजीचे वातावरण आहे.