कोकण रेल्वे समन्वयक समितीची मागणी, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / खेड
पश्चिम रेल्वेने ६ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वे मार्गे जामनगर-तिरुनेवेल्ली साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेसला केवळ वसईरोड, पनवेल व रत्नागिरी याठिकाणी निव्वल तांत्रिक कारणांसाठी थांबे देण्यात आले आहेत. या साप्ताहिक एक्सप्रेसला रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी प्रत्येकी एक वाढीव थांबा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या एक्सप्रेसच्या राज्यातील दोन थांब्यामधील सरासरी अंतर २५० ते २७० किलोमीटर असून राज्याबाहेर हे अंतर ५० ते ७० किलोमीटर एवढे कमी होते. राज्याबाहेर प्रत्येक ७० किलोमीटरवर थांबणारी ही एक्सप्रेस राज्यात २५० किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर कुठेही न थांबता धावते. कोकण मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, राजधानी, तेजस यासारख्या प्रिमियम गाड्यांपेक्षाही कमी थांबे या एक्सप्रेसला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एकही थांबा नाही.
केरळच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी पनवेल – पुणे – मिरज – लोंढा – मडगाव हा पर्यायी मार्ग असून महाराष्ट्रातील कोकण विभागाला कोकण रेल्वेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गे जाणारी प्रत्येक गाडी महाराष्ट्रात जास्तीत जास्त थांब्यांवर थांबणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर जामनगर – तिरुनेवेल्ली या साप्ताहिक एक्सप्रेसला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आणखी एक प्रत्येकी वाढीव थांबा ( तांत्रिक थांबे सोडून ) द्यावेत, अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीचे कार्यवाहक अक्षय म्हापदी, सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी केले आहे.