जिल्हा शिक्षक भारतीची मागणी
प्रतिनिधी / खेड
रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बँकेचे खातेदार म्हणून अपघात सुरक्षा योजनेचे विम्याचे सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा शिक्षक भारतीने केली आहे. याबाबतचे निवेदन बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांना दिले आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांना वेतन खाते कोणत्या बँकेत ठेवावे याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. सध्या विविध बँका याबाबत जागरूकतेने आपल्या बँकेत अधिकाधिक खातेदार राहतील, याबाबत प्रयत्नशील आहेत. त्यानुसार राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका कर्मचारी खातेदारांना विविध लाभ देण्यास इच्छुक आहेत. याबाबत खातेदार असलेले कर्मचारी आग्रही आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हजारों माध्यमिक शाळा कर्मचारी खातेदार आहेत. मात्र, या खातेदारांना सद्यस्थितीत विम्याचे संरक्षण दिलेले नाही.
इतर बँकांमध्ये असलेली सुविधा लक्षात घेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही ही सुविधा देण्याची आग्रही मागणी शाळा कर्मचाऱ्यांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील व पदाधिकाऱ्यांनी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांची भेट घेवून चर्चा केली. बँकेने कर्मचारी खातेदारांना अपघात सुरक्षा विमा योजनेचे कवच देवून त्यासाठी ५० लाख रूपयांचा विमा निर्धारित करण्याची मागणी करण्यात आली.
बँकेने पगारदारांना वेतन तारण कर्ज देताना कर्ज व्याजदरात सवलत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. अपघात सुरक्षा विमा योजनेबाबत बँकेकडून निश्चितच प्राधान्य देवून विचारविनियम करण्यात येईल. तसेच याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन बाबाजी जाधव यांनी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी माध्यमिक पतपेढीचे संचालक अमित कदम, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, तालुका कार्यवाह पोपट जगताप आदी उपस्थित होते.