प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशासकीय कारभाराची सूत्रे हाती घेताना येथील ग्रामीण विकासाबाबतीत असलेल्या समस्या प्रथम जाणून घेण्यात येतील. त्या समस्या निवारणासाठी उपाययोजना करणे अडचणीचे ठरणार नाही. जेणेकरून जिल्ह्याचे नाव विकासात्मक दृष्टीने आणखीन पुढे येण्यास मोलाची मदत होईल, असे प्रतिपादन नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे इंदूराणी जाखड यांनी नुकतीच स्वीकारली. गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर जाखड यांची शासन स्तरावरून रत्नागिरी जिल्हा परिषद येथे नियुक्ती झाली आहे. येथील प्रशासकीय पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पदाधिकारी, खातेप्रमुख यांच्याशी चर्चा केली. प्रशासकीय कारभार सांभाळताना जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांच्या माध्यमातून विकासावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून जि. प. पदाधिकारी यांच्यात समन्वय अत्यंत गरजेचा आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनाला सहयोग राहिल, अशी अपेक्षा जाखड यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बचतगटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील समस्या कोणत्या आहेत, त्या प्रथम जाणून घेतल्या जातील. त्यानुसार त्या समस्या सोडविण्याच्या उपाययोजना आखणे सोपे जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी बोलताना सांगितले. शासनाकडून कर्मचारी बदल्यांचा जीआर आलेला आहे. त्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगितले.
कोरोनाची साखळी रोखण्यासाठी सर्वांनी घ्यावी खबरदारी
जिल्हा परिषदेच्या प्रशासन कार्यवाहीबाबत त्यांनी जिल्ह्यायातील कोरोना समस्येचा अधिकाऱयांकडून आढावा घेतला. आगामी गणेशेत्सव जवळ आला आहे. त्यामुळे या काळात कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जातील. कोविड 19चे जिल्ह्यातील नियंत्रण राखणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक उपाययोजना आखण्यात येतील. येणाऱया गणेशोत्सव काळात नियंत्रण राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतची काळजी घ्यावी. जेणेकरून कोरोनाची वाढती साखळी रोखण्यास मोलाची मदत होईल. यासाठी जिल्हाधिकाऱयांसोबत चर्चा करण्यात येतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी सांगितले.