प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना काळात बंद असलेल्या माध्यमिक शाळा सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी 4 माध्यमिक शाळा सुरु झाल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, राजापूर आणि दापोली तालुक्यामध्ये 4 माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. हळूहळू आणखीही शाळा सुरु होतील. प्रत्येक गावातील दक्षता समितीला शाळा सुरु करण्याविषयी शिफारस करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शाळा सुरु होण्याच्या संख्येत हळूहळू वाढ होईल.
राज्य सरकारने आठवी ते बारावी या इयत्तांचे वर्ग गावस्तरावरील दक्षता समितीच्या शिफारशीनंतर सुरु करता येतील, अशी मुभा दिली आहे. 15 जुलैपासून शाळा सुरु करता येतील, असे शासकीय निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी 4 शाळा सुरु झाल्या. दरम्यान दापोली प्रतिनिधींनी कळवले की, टाळसुरे येथील शाळा वेगवेगळ्या गावामधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण सुरु करण्यात आले आहे.