रत्नागिरी/प्रतिनिधी
जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली असून भात पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे त्याच बरोबर नाचणी पिकाची ९ हजार हेक्टरवरील लागवड पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्याभरात जुलैअखेर समाधानकारक पावसामुळे सुमारे नव्वद टक्के भात लागवड पूर्ण झाली आहे मागील काही दिवसांमध्ये पावसाने चांगली साथ दिल्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी सुखावला असून आपल्या कुटुंबासमवेत शेतीची लागवड करतांना दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती ओढवल्यामुळे चाकरमान्यांनी गावाची वाट धरली त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना चाकरमान्यांची साथ मिळाल्यामुळे शेतीची कामे लवकर आटपली आहेत चाकरमानी मुळे जिल्ह्याभरात ५ हजार हेक्टर एवढी भातशेती वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे समाधानकारक पाऊस झाल्यास राहिलेली भात लागवड लवकरच पूर्ण होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले यावर्षी पावसाची स्थिती चांगली राहिल्यामुळे पीकही चांगले येण्याचे संकेत आहे. सद्या शेतकरी आधुनिक तंत्राच्या सहाय्याने शेती करत असल्याचे चित्र आहे पारंपरिक बैलजोडी बरोबरच पावर टिलर च्या साथीने शेतीची कामे लवकरात लवकर आटोपत आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी भात लागवडीखालील क्षेत्र अधिक वाढल्याने भाताचे विक्रमी उत्पादन वाढेल असा अंदाज बळीराजाने वर्तवला आहे